प्रेमात काहीही होऊ शकतं..त्यात जर प्रेम करणारे अल्पवयीन असतील, तर काय होईल याचा विचारच न केलेला बरा! असाच काहीसा प्रकार हा मुंबईच्या साकीनाक्यात समोर आला असून इथे एका १६ वर्षीय मुलाने आपल्या मैत्रिणीसाठी चक्क स्वतःच्याच कुटुंबाकडून ५० लाखांची खंडणी मागितल्याचं समोर आलं आहे.
साकीनाक्यात रहाणाऱ्या एका कुटुंबाची झोप त्यावेळी उडाली, जेव्हा त्यांच्या हरवलेल्या १६ वर्षीय मुलाचं अपहरण झाल्याचं त्यांना समजलं. एका अनोळखी मोबाईलवरून त्यांना फोन आला आणि 'मुलगा हवा असेल तर ५० लाख घेऊन या' असं ठणकावण्यात आलं. कुटुंब धास्तावलं खरं, पण त्यांनी प्रसंगावधान दाखवत पोलिसांची मदत घेतली.
प्रश्न लहान मुलाच्या जिवाचा असल्याने गुन्हे शाखेची मदत घेण्यात आली. ज्या इसमाने खंडणीसाठी फोन केला होता, त्याने ५० लाख घेऊन मनोरा पालघरला येण्यास सांगितले होते. तात्काळ गुन्हे शाखा कक्ष १० चं पथक तिथे पोहोचलं आणि त्यांनी मनोरातील लक्ष्मी रेसिडेन्सी नावाच्या लॉजवरून या सोळा वर्षीय मुलाची सुटका केली. मुलासोबत एक १९ वर्षीय मुलगा देखील तिथे होता, त्याला देखील गुन्हे शाखेने पकडले.
मुलाच्या चौकशीत जी काही माहिती समोर आली, त्याने गुन्हे शाखेचे अधिकारी देखील चक्रावून गेले. हा सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगा अभ्यासात कमकुवत होता. त्याला पुढे शिकायची इच्छा नव्हती. त्याला त्याच्या मैत्रिणीसोबत पळून जायचं होतं. मात्र, त्यासाठी पैसे कसे उभे करायचे? म्हणून त्याने हा बनाव रचल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या सगळ्यासाठी त्याने आपल्या बालपणीच्या मित्राची मदत घेतली. त्याच्या सोबत तो पालघरला गेला आणि आपल्या घरच्यांना ५० लाखांच्या खंडणीसाठी फोन केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 'सध्या दोन्ही मुलांना साकीनाका पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे गुन्हे शाखेचे डीसीपी निसार तांबोळी यांनी सांगितले.
हेही वाचा
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)