मुलुंड पश्चिमेकडील एका महिलेने गुरुवारी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याप्रकरणी नवघर पोलिसांनी पोलीस निरीक्षक दामोदर चौधरी, त्यांची पत्नी भारती चौधरी आणि मुलगी नीलाक्षी चौधरी अशा तिघांविरोधात कलम ३०६ आणि ३४ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. रिया पालांडे असं आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव असून तिने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये चौधरी कुटुंबाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं म्हटलं अाहे. त्यावरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
मुलुंड पश्चिमेकडील श्री समर्थ व्हिला इमारतीत राहणाऱ्या रिया पालांडे या महिलेनं आत्महत्येआधी घराच्या भिंतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस असलेल्या भारती चौधरी आणि त्यांचं कुटुंब मृत्यूला कारणीभूत असल्याचं लिहिलं आहे.
तसेच आपल्या दुकानातील डायरीमध्येही त्यांनी पोलीस निरीक्षक दामोदर चौधरी, भारती आणि मुलीने कसा छळ केला? हे लिहिलं आहे. पैशांच्या देवाणघेवाणीतून चौधरी कुटुंब तिला त्रास देत होतं तसेच बदनामी देखील करत होतं. यामुळे आत्महत्या केल्याचं रिया यांनी लिहून ठेवलं आहे.
या प्रकरणी रिया यांच्या मुलाने नोंदवलेल्या तक्रारीवरून तिघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात नवघर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी सध्या काहीही बोलण्यास नकार दिला आहे. या प्रकरणी आता लवकरच चौधरी कुटुंबाला अटक होण्याची शक्यता आहे.