लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून ठिक-ठिकाणाहून लाखो रुपये पकडले आहेत. अनेकांनी या पैशांवर दावे ठोकले खरे, मात्र मुंबईत पकडण्यात आलेल्या ६ कोटी रुपयांसाठी अद्याप कुणीही पुढे आलेलं नाही. त्यामुळे हे पैसे नक्की कुणाचे आहेत याचा आता प्राप्तिकर अधिकारी शोध घेत आहेत. मुंबईतून पोलिसांनी आतापर्यंत पकडण्यात आलेल्या १४ कोटी रुपयांमध्ये ९ कोटी रुपयांवर दावा करण्यात आलेला आहे. त्यामुळे उरलेले हे ६ कोटी रुपये हवाला व्यवहारातील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मुंबईतील झवेरी बाजार व ऑपेरा हाऊस या परिसरात मोठ्या प्रमाणात सोने-चांदीचा व्यवसाय चालतो. यातील अनेक व्यापारी हे हवालामार्फत पैशांचे व्यवहार करत असल्याने तो परिसर आर्थिकदृष्ट्या संवेदनशील समजला जातो. त्यामुळे निवडणुकांच्या काळात या ठिकाणांवर प्राप्तीकर विभागाची करडी नजर असते. आचारसंहिता लागू झाल्यानंतर ऑपेरा हाऊस येथे एक व झवेरी बाजार येथे आतापर्यंत चार कारवाया करण्यात आल्या. त्यातून जप्त करण्यात आलेल्या रकमेपैकी ६ कोटी रुपयांवर कोणीही दावा केलेला नाही.
या परिसरात अंगडिया व्यावसायिकांचं मोठं जाळं आहे. तसंच हवाला व्यवसायही मोठ्या प्रमाणात चालतो. त्यातीलच ही रक्कम असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. २०१४ मध्येही प्राप्तिकर विभागाकडून याच परिसरातून मोठ्या प्रमाणातून बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली होती.
गुप्त माहितीनुसार या दोन परिसरांमध्ये पाच कारवाया करण्यात आल्या आहेत. झवेरी बाजार येथील एका गाळ्यावर छापा टाकण्यात आला. त्यावेळी तेथील एका बॅगेत सुमारे अडीच कोटींची बेहिशेबी मालमत्ता सापडली होती. ती रक्कम गाळे मालकाने आपली नसल्याचा दावा केला आहे. तर एका कारवाईत कारमधून आणखी काही रक्कम जप्त करण्यात आली होती. अद्याप या रकमेवर कोणीही दावा करण्यासाठी पुढे आलेले नसल्याचे एका अधिकाऱ्यानं सांगितलं.
हेही वाचा -
चित्रपट प्रदर्शित करण्याच्या नावाखाली निर्मात्याला सव्वा कोटीचा गंडा
बेपत्ता आई-वडिलांच्या शोधसाठी मुलीचा टाहो, पोलिसही लागले कामाला