मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात नसल्याचं आतापर्यंत ठामपणे पाकिस्तानकडून सांगितलं जातं होतं. पण पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांचाच हात असल्याची स्पष्ट कबुली दिली आहे.
शनिवारी मुलतान इथं शरीफ यांची सभा होती. या सभेच्या आधी शरीफ यांनी डाॅन या वृत्तपत्राला खास मुलाखत दिली. या मुलाखतीत मुंबई हल्ल्याबाबत पाकमध्ये बंद पडलेल्या खटल्यासंदर्भात शरीफ यांना विचारले असता त्यांनी हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या या कबुलीमुळे पाकिस्तानी दहशतवाद्यांकडूनच भारताला, मुंबईला टार्गेट केलं जात असल्याचं स्पष्ट झालं आहे.
मुंबई हल्ल्याबातच्या इतर प्रश्नांना उत्तर देताना शरीफ यांनी पाकिस्तानात दहशतवादी संघटना कार्यरत असल्याचंही म्हटलं आहे. तर 'या संघटनांना सीमा ओलांडून मुंबईत १५० लोकांची जीव घेण्याची परवानगी द्यायली हवी का? याचं उत्तर मला द्या' असंही शरीफ यांनी म्हटलं आहे.
या हल्ल्यासंबंधीच्या खटल्याच्या सुनावणीला विलंब झाल्याचा दाखला देत शरीफ यांनी आम्ही सुनावणी का पूर्ण केली नाही, याचंही उत्तर आम्हाला द्यावं लागणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. शरीफ यांच्या या कबुलीमुळं पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे.