अशिक्षित म्हणून हिणवल्याच्या वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी संध्याकाळी धारावीत घडली. २७ वर्षीय तरुणाने आपल्या १८ वर्षीय मित्रावर चाकूने ५० वार करत त्याची हत्या केली. मोहम्मद अफरोज आलम शेख असं त्या मृत तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी शाहूनगर पोलिसांनी मोहम्मद आमीर अब्दुल वाहिद रहीन याला अटक केली आहे.
मोहम्मद अफरोज आलम शेख हा धारावी परिसरात राहणारा असून आमिर देखील त्याच्याच घराजवळ रहायचा. मूळचा बिहारचा रहिवासी असलेल्या अफरोजचं शिक्षण हे इंग्रजीतून झालं होतं. तर आमिरने दहावीनंतर शाळा सोडली होती. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. मात्र, अफरोज मित्रांमध्ये असताना आमिरला अनेकवेळा टोकायचा. तर प्रत्येकवेळी त्याला अशिक्षित म्हणून हिणवायचा. याच गोष्टीचा राग आमिरला अनावर झाल्याने बुधवारी संध्याकाळी त्याने माहिमच्या रहेजा पुलाजवळ अफरोजला दारू पिण्यासाठी बोलावून घेतलं. त्यावेळी अफरोज नशेत धुंद असल्याचे पाहून आमिरने त्याच्यावर चाकूने वार केला.
राग अनावर झालेल्या आमिरला अफरोजचा मृत्यू झाल्याचं कळाल्यानंतरसुद्धा तो त्याच्यावर चाकूने वार करत होता. अफरोजच्या हत्येनंतर रक्ताने माखलेल्या कपड्यात आमिरने पोलिस ठाणे गाठून गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी शाहूनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आमिरला अटक केली. तर अफरोजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात पाठवला.
हेही वाचा