पुण्यातून ४ महिन्याच्या मुलीचं अपहरण करून विक्रीसाठी मुंबईत घेऊन आलेल्या मनिषा काळे नावाच्या महिलेला ओशिवरा व अंबोली पोलिसांनी जेरबंद केलं अाहे. पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर अपहरण करण्यात आलेल्या मुलीचा ताबा तिच्या पालकांना दिला आहे.
पुणे परिसरात राहणारे तक्रारदार आपल्या ४ महिन्याच्या मुलीला घेऊन पुणे रेल्वे स्थानकावर रेल्वेची वाट पहात थांबले होते. मुलगी झोपली असल्याने तिला स्थानकावरील बेंचवर ठेवलं होतं. यावेळी रेल्वे स्थानकाजवळील झोपडपट्टीत राहणाऱ्या मनिषा काळेने पालकांची नजर चुकवून त्या मुलीचं अपहरण केलं. मुलीला स्वत:जवळ बाळगणं धोकायक असल्याने मनिषा तिला घेऊन मुंबईला गेली. इकडे स्थानकावर मुलगी न सापडल्याने तिच्या पालकांनी पुणे रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
२३ ऑगस्ट जी बकरी ईदनिमित्त मुंबईत चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आंबोली पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस नाईक दुधाड, हवालदार पवार, महिला पोलीस हवालदार गावनग हे पथक पोलीस मोबाईल व्हॅन क्र. ५ मधून गस्त घालत होते. त्यावेळी त्यांच्याकडे वर्षा पवार (२०) ही तरूणी आली. एका महिलेनं पुणे रेल्वेस्थानकातून ४ महिन्यांच्या बाळाचं अपहरण केल्याचं वर्षाने पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी तात्काळ बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल येथे धाव घेऊन बाळासह मनिषाला अाणि तिच्या महिला साथीदाराला ताब्यात घेतलं.
ओशिवरा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक शर्मिला पाटील व पोलीस उपनिरीक्षक मोटे यांनी मनिषाची कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. मात्र, मनिषाच्या साथीदार महिलेचा सहभाग अद्याप निश्चित झाला नसून पोलिस तिची चौकशी करत आहेत. ओशिवरा व अंबोली पोलिसांनी तात्काळ पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता बाळाच्या अपहरणाचे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात (गु. र. क्र. ८८८/१८) भादंवि कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला अाहे.
हेही वाचा -
बनावट ईमेलच्या मदतीने कंपनीला कोट्यवधीचा गंडा
क्रिस्टल टाॅवर आग: सुपारीवाला बिल्डरला २७ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी