मुंबईतल्या गाड्या चोरून त्याची उत्तर प्रदेशमध्ये विक्री करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अहमद बशीर अहमद शेख या मास्टरमाईंडसह मोहसीन अशरफ बलोच या दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना 17 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावाली असल्याची माहिती पोलिस उपायुक्त (गुन्हे) दिलीप सावंत यांनी दिली.
मुंबईतून नामांकीत गाड्या चोरीला जात असल्याच्या तक्रारीत दिवसेंदिवस वाढ होत होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी काही दिवसांपूर्वी हजरत अली फक्रुद्दीन खान आणि अयुबअली शेख उर्फ गुड्डु या दोघांना अटक केली होती. या दोघांच्या चौकशीत अहमद बशीर आणि मोहसीन बलोच या दोघांची नावं समोर आली होती.
त्यानुसार, पोलिसांनी याचा तपास करण्यास सुरुवात केली असता, यातील मोहसीन बलोच हा चोरी केलेली स्विफ्ट कार घेऊन जोगेश्वरी येथे येणार असल्याची महिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी सापळा लावला. अशातच, मोहसीन बलोचला अटक करण्यात आली. तर अहमद बशीरने येथुन पलायन केले.
बलोचच्या चौकशीतून अहमदने बशीर वालीव आणि विरार पोलिस ठाण्यांतर्गत दरोडा टाकल्याची माहिती पोलिसांना दिली. त्याचा माग काढण्यास पोलिसांनी सुरुवात केली होती. त्यातच तो नागपाडा येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बशीर अहमदला अटक केली. यावेळी त्याच्याकडून दोन वाहने, एक मोटर आणि लॉरी तसेच कोट्यवधींची दरोड्याची रक्कम जप्त करण्यात आल्याचे दिलीप सावंत यांनी सांगितलं.
यादरम्यान या सराईत गुन्हेगारांनी मोटार लॉरीसह चोरलेले 31 टन तांबे हे गुजरात राज्यात 1 कोटी 81 लाखांना विकले होते. त्यानुसार, पोलिसांनी गुजरातमध्ये जाऊन जप्त केलेल्या कॉपरसह 1 कोटी, 81लाख रुपये जप्त केले. याचा अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.