प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारीला शिवाजी पार्कवर होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यादरम्यान सरकारचा निषेध करत आत्मदनाचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हे तिघेही जण परभणीचे असून सरकारचा निषेध करण्यासाठी ते मुंबईत आल्याची माहिती पोलिस उपायुक्त दिपक देवराज यांनी दिली.
दिल्लीत सिमीच्या दहशतवाद्याला अटक झाल्यानंतर देशात प्रजासत्ताक दिनानिमित्त हायअलर्ट जारी करण्यात आला होता. त्यातही मुंबई दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. २६ जानेवारीला शिवाजी पार्क येथे संचालनादरम्यान काही जण निदर्शने करणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस संशयितांवर पाळत ठेवून होते.
त्यानुसार शिवाजी पार्क परिसरात २ पुरूष आणि एक महिला संशयास्पदरित्या फिरताना पोलिसांना आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्या महिलेचं नाव अखिलाबेगम समशेर खान (३५) असं आहे. ती मुलगा मन्सूरखान समशेर खान (१५) तसेच तिचा दिर यासिन खान शामिर खान (३०) यांच्यासह शिवाजीपार्क मैदान इथं आत्मदहन करण्यासाठी आली होती. महिलेकडे एक रॉकेलची बाटली आणि एक छोटा चाकू मिळाला असून तो हस्तगत करण्यात आला आहे.
अखिलाबेगमचा पती समशेर खान याला नानलपेठ पोलीस ठाणे, परभणी येथील पोलिसांनी २५ डिसेंबर २०१६ रोजी सकाळी एका गुन्ह्यात चौकशीसाठी उचलून नेलं होतं. त्याच दिवशी सायंकाळी त्याचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्याचं अखिलाबेगमला समजलं. याप्रकरणी परभणी गुन्हे शाखेने गु.र.क्र.१५१/१७ कलम ३०२,३३१,३४८,३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हयात पो.नि.एम.एस.रौफ यांना अटक झाली. तर दोन कर्मचारी या गुन्ह्यात अजून फरार आहेत. आपल्याला न्याय मिळाला नसून योग्य आर्थिक पुनर्वसन न झाल्याने आत्मदाह करण्याचा निर्णय घेतल्याचं तिने चौकशीत सांगितलं.