रेल्वेखाली येऊन तीन महिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी मालाड-गोरेगाव स्थानकादरम्यान घडली. यामध्ये एक महिला गंभीर झखमी झाली आहे. या चारही महिला मजूर असून रेल्वे ट्रॅकवर काम करत असताना अपघात झाल्याची प्राथमिक माहिती जीआरपीने दिली आहे.
मालाड-गोरेगाव स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅकचे काम आटोपल्यानंतर सुनिता भोरयालय (35), अनिता शिंदे (32), जया खटावसे (35) आणि शिवानी भोरयालय (18) या चारही महिला मालाड स्टेशनला जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्याचवेळी चर्चगेटच्या दिशेने जात असलेल्या इंदोर-वांद्रे भरधाव वेगात असलेल्या या एक्स्प्रेसने महिलांना धडक दिली. यामध्ये अनिता शिंदे, जया खटावसे आणि शिवानी भोरयालय या तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर सुनिता भोरयालय ही गंभीर जखमी झाली. जखमी महिलेला उपचारांसाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या घटनास्थळी जीआरपीचे वरिष्ठ अधिकारी दाखल झाले असून तपास सुरू असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे पोलीस उपायुक्त पुरुशोत्तम कराड यांनी दिली.