बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अर्थरोड कारागृहातुन बाहेरपडून 'मन्नत'कडे म्हणजेच स्वतःच्या घरी दाखल झाला आहे. तब्बल २६ दिवसानंतर आर्यनला आणि खान कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.
आर्यन खान याला अमली पदार्थ प्रकरणात गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर होऊनही पुढील कायदेशीर प्रक्रिया वेळेत पूर्ण होऊ न शकल्याने शुक्रवारची रात्रही आर्थर रोड तुरुंगातच काढावी लागली. अखेर शनिवारी सकाळी ११च्या सुमारास कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन आर्यन तुरुंगाबाहेर आला.
दरम्यान आर्यन तुरुंगातून बाहेर जरी आला असला तरी त्याला व अन्य २ आरोपींना जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाने १४ अटी घातल्या आहेत.
'या' आहेत अटी
- एनडीपीएस न्यायालयात पासपोर्ट जमा करावा लागेल आणि न्यायालयाच्या परवानगीविना देशाबाहेर जाता येणार नाही
- एक लाख रुपयांची वैयक्तिक हमी आणि तेवढ्याच रकमेचे एक किंवा अधिक हमीदार
- या प्रकरणातील सहआरोपी व अशाप्रकारच्या कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधू नये
- या प्रकरणातील साक्षीदारांवर स्वतः किंवा कोणाच्याही माध्यमातून दबाव आणू नये आणि पुराव्यांशी छेडछाड करू नये
- या प्रकरणाशी संबंधित खटल्याबद्दल प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा सोशल मीडियावर काहीही बोलू नये
- कधीही मुंबईबाहेर जायचे असल्यास एनसीबीच्या तपास अधिकाऱ्याला त्याची माहिती देऊन प्रवास व निवासाचा तपशील द्यावा लागेल
- तपास अधिकारी बोलावतील तेव्हा चौकशीला हजर राहावे लागेल
- जो आरोप आहे व जो गुन्हा दाखल झाला आहे अशाप्रकारच्या कृत्यात सहभागी होऊ नये
- खटल्याची सुनावणी सुरू झाल्यानंतर ती लांबवण्याचा कोणत्याही प्रकारे प्रयत्न करू नये
- खटल्यावर परिणाम होईल, असे कोणतेही कृत्य करू नये
- अत्यंत अपरिहार्य कारण वगळता खटल्याच्या प्रत्येक सुनावणीला न्यायालयात हजर राहावे लागेल
अशा सर्व अटींपैकी कोणतीही अट आरोपींनी मोडल्यास एनसीबीला त्यांचा जामीन रद्द होण्यासाठी थेट विशेष एनडीपीएस न्यायालयात अर्ज करता येईल