Advertisement

अंतिम वर्षाच्या परीक्षा नियोजनासाठी कुलगुरूंची समिती गठीत

अंतिम वर्षाच्या परीक्षांचं नियोजन करण्यासाठी यासाठी कुलगुरूंची समिती गठीत करण्यात आल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

अंतिम वर्षाच्या परीक्षा नियोजनासाठी कुलगुरूंची समिती गठीत
SHARES

राज्यातील कोविड-१९ चा प्रादुर्भाव आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा सहज आणि सुलभ पद्धतीने कशा आणि कधी घेता येतील, परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना कोणत्याही मानसिक त्रासाला सामोरं जावं लागणार नाही, यासंदर्भातील नियोजन करण्यासाठी  यासाठी कुलगुरूंची समिती गठीत करण्यात आल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात  झूमच्या माध्यमातून १३ अकृषी विद्यापींठाच्या कुलगुरू सोबत ऑनलाईन बैठक झाली. (committee appointed in maharashtra for university final year examination)

यावेळी उदय सामंत म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या परीक्षेसंदर्भातील निर्णयानुसार राज्यातील अंतिम वर्षांच्या परीक्षा एका समान पद्धतीने कधी आणि कशा घेता येतील याचं नियोजन करणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन एकाही विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेऊन विद्यापीठांनी एका समान पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी नियोजन करावं तसंच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचनांनुसार ३० सप्टेंबर २०२० पर्यंत परीक्षा घेणं शक्य आहे का? याबद्दलही विचार करावा, अशा सूचना उदय सामंत यांनी दिल्या.

हेही वाचा - अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना द्यावीच लागणार परीक्षा, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

विद्यार्थ्यांची परिक्षेसंदर्भातील मानसिकता लक्षात घेऊन कमीत कमी संसाधनामध्ये आणि सहज आणि सोप्या पद्धतीने परीक्षा कशा घेता येतील यासाठीचा अभ्यास करण्यासाठी कुलगुरुंची समिती नेमण्यात आल्याचंही उदय सामंत यांनी सांगितलं.

या समितीने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचनांचा विचार करून परीक्षा कशा आणि कधी घेता येतील आपला अहवाल सादर करावा. समितीच्या निर्णयानंतर राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून परीक्षेबाबतचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल, असंही उदय सामंत यांनी सांगितलं. या बैठकीत गोवा, दिल्ली, मध्यप्रदेश, बनारस विद्यापीठ यांनी कशा पद्धतीने तेथील परीक्षा घेतल्या आहेत, याचाही सविस्तर आढावा  घेण्यात आला.

त्यानंतर झालेल्या बैठकीत विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात दिलेल्या मार्गदर्शक सूचना, सर्व अकृषी विद्यापींठाच्या कुलगुरुंनी बैठकीत दिलेल्या सूचना, राज्यातील कोविड-१९ चा प्रादुर्भाव आणि विद्यार्थी, पालक यांच्या परीक्षेसंदर्भातील सूचना, निकालाची प्रक्रिया, शैक्षणिक वर्ष या सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विभागाचे अपर मुख्य सचिव राजीव जलोटा, संचालक डॉ. धनराज माने, तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ, माजी कुलगुरू राजन वेळूकर, विजय खोले उपस्थित होते. 

हेही वाचा - परीक्षा घेण्यासंदर्भात उच्च शिक्षणमंत्री म्हणाले…

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा