जून अखेरीस १० वीचा निकाल लागणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल कसा लावणार याविषयी निकष जाहीर केले आहेत. गायकवाड यांनी शुक्रवारी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षांविषयी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी दहावी मूल्यमापन प्रक्रिया आणि अकरावी प्रवेशाबाबत सविस्तर माहिती दिली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्य सरकारने यंदा दहावीची परीक्षा रद्द केली आहे. राज्य सरकारनं शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये दहावी परीक्षेसाठी प्रविष्ठ असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्याबाबत परवानगी दिली आहे.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालासंदर्भात आणि अकरावीच्या प्रवेशाबद्दलची प्रक्रिया जाहीर केली. गायकवाड यांनी सांगितलं की, सर्व घटकांशी सखोल चर्चा करुन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणदान करण्याबाबतचे धोरण निश्चित केले आहे. दहावीच्या निकालासाठी १०० टक्के गुणांपैकी ५० टक्के गुणांचे वेटेज दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनावर तर ५० टक्के गुणांचे वेटेज नववीच्या अंतिम परीक्षेच्या गुणांना देऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केलं जाणार आहे.
दहावी परीक्षेच्या निकालाचे निकष
- वर्षातील लेखी मूल्यमापन – ३० गुण
- दहावीचे गृहपाठ, तोंडी किंवा प्रात्यक्षिक अंतर्गत – २० गुण
- नववीचा विषयानिहाय गुण – ५० गुण
महत्त्वाचे मुद्दे
- जून महिन्याच्या अखेरीस दहावीचा निकाल जाहीर करणार
- निकाल समितीमध्ये मुख्यध्यापकांच्या खाली ७ सदस्य असतील.
- मूल्यमापनावर आक्षेप असल्यास कोरोनानंतर परीक्षा
- समाधानकारक निकाल वाटत नसेल तर विद्यार्थ्यांना दोन परीक्षा कोविडनंतर देता येतील.
- अकरावी प्रवेशासाठी २ तासांची सीईटी
- दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारीत सीईटी
- सीईटी परीक्षेतील गुणांनुसार प्राधान्याने प्रवेश
- नंतर रिक्त असलेल्या जागांवर १० वी मध्ये अंतर्गत मूल्यमापन गुणांद्वारे प्रवेश.
अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन सीईटी परीक्षा घेण्यात येणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितले. सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी वैकल्पिक सीईटी परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर अवलंबून असतील. अकरावी प्रवेश प्रक्रिया राबवताना सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. यानंतर कनिष्ट महाविद्यालयांकडे ज्या जागा रिक्त राहतील त्या जागावंर जे विद्यार्थी प्रवेश घेणार नाहीत त्यांना प्रवेश देण्यात येईल, असं देखील वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
बारावी परीक्षेसंदर्भात सीबीएसईसोबत चर्चा करत आहोत. कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांच आरोग्य आणि सुरक्षा ही राज्य सरकारची प्राथमिकता आहे. केंद्रानं लसीकरणासाठी पुढाकार घेतला पाहिजे. सीबीएसई बोर्डाचे महाराष्ट्रातील २५ हजार विद्यार्थी आणि राज्य मंडळाचे १४ लाख विद्यार्थी आहेत. त्यांची सुरक्षा लक्षात घेणं महत्वाचं आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
हेही वाचा -