अकरावीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्याला आता कोणत्याही परिस्थिती प्रवेश रद्द करता येणार नाही. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार विशेष फेरीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द करण्यास सुरूवात केल्याने अकरावी प्रवेशाचा गुंता अधिक वाढला आहे. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्याला आपला प्रवेश रद्द करता येणार नाही, असे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने स्पष्ट केले आहे. शिक्षण उपसंचालकांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्यास तुमचा प्रवेश अडचणीत येऊ शकतो.
अकरावी प्रवेशाच्या चार फेऱ्या झाल्यानंतरही अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित होते. त्यानंतर एक विशेष फेरी राबवण्यात आली. या पाचव्या फेरीसाठी १९,३३६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील १६,२५३ विद्यार्थ्यांचे नाव या पाचव्या फेरीच्या प्रवेशासाठी आले होते. उर्वरीत ३०८६ विद्यार्थ्यांना अद्याप कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश मिळाला नसल्याने या आणि पाचव्या फेरीत नाव येऊनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी २१ ते २८ ऑगस्ट या काळात 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वानुसार प्रवेश देण्यात येत आहे.
यासाठी विद्यार्थ्यांचे गुणवत्तेच्या आधारे तीन गट तयार केले आहेत. मात्र या फेरीमध्ये आपल्याला हवे ते महाविद्यालय निवडण्याची संधी मिळणार आहे, असा गैरसमज करून अनेक विद्यार्थ्यांनी घेतलेले प्रवेश रद्द करण्यास महाविद्यालयात विचारणा सुरू केली आहे.
या फेरीअंतर्गत महाविद्यालयात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश रद्द केले, तर प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्याला महाविद्यालयात प्रवेश मिळणे कठीण होईल. अकरावी प्रवेश प्रक्रिया आणखी किचकट होईल. त्यामुळे अकरावीच्या चार आणि पाचव्या विशेष फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना आता प्रवेश रद्द करता येणार नाही, असे शिक्षण उपसंचालक कार्यालयातून सांगण्यात आले आहे.
हे देखील वाचा -
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)