अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षीत जागेवर इतर विद्यार्थ्यांना प्रवेश देत मुंबईतील काही काॅलेज घोटाळा करत असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून केला होता. त्यावर उत्तर देताना या प्रवेश घोटाळ्याची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी सभागृहात दिली.
राज्यातील अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के प्रवेश कोटा असतो. परंतु मुंबईतील एचआर, जयहिंद, केसी अशा नामांकित काॅलेजांत अल्पसंख्यांक कोट्याअंतर्गत केवळ ५ ते १० टक्के प्रवेश भाषिक अल्पसंख्यांना देण्यात येतात. तर उरलेल्या ४० ते ४५ टक्के जागा इतर विद्यार्थ्यांना विकण्यात येतात. या जागांसाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून ४ ते ५ लाख उकळले जात असल्याचा आरोप मुंडे यांनी केला.
एचआर कॉलेजची विद्यार्थी क्षमता ९०० जागांची आहे. जयहिंदमध्ये १२०० आणि केसी कॉलेजमध्ये १३५० एवढी प्रवेश क्षमता आहे. त्यातील जागांचा हिशेब धरल्यास हे काॅलेज वर्षाला लाखो रुपये कमावतात. ५० टक्के कोट्यातील जागा शिल्लक राहिल्यास काॅलेज या जागा शासनाला प्रत्यार्पित करतात असं निवेदन सरकारकडे करण्यात आलं आहे. प्रत्यक्षात तसं होत नसल्याकडे मुंडे यांनी लक्ष वेधलं.
त्यामुळे अल्पसंख्यांकांच्या राखीव जागा विकणारे काॅलेज आणि शिक्षण उपसंचालकावर गुन्हा दाखल करून संबंधित काॅलेजांचा अल्पसंख्यांक दर्जा काढून घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
त्यावर उत्तर देताना या प्रवेश घोटाळ्याची केस टू केस चौकशी करून यंदाच्या शैक्षणिक वर्षात एकही ऑफलाईन प्रवेश होणार नाही, असं आश्वासन शेलार यांनी दिलं.
हेही वाचा-
आॅक्टोबरमध्ये होईल विधानसभा निवडणूक- चंद्रकांत पाटील
मुख्यमंत्रीपदाबाबत माध्यमांशी तुम्ही बोलू नका- मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे