विधानसभा निवडणुकीसाठी येत्या सप्टेंबर महिन्यात आचारसंहिता लागेल आणि ऑक्टोबरमध्ये निवडणुका होतील, अशी शक्यता महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
२०१४ मधील विधानसभा निवडणुकसाठी १५ ऑक्टोबरला मतदान झालं होतं. त्यामुळे यंदा १५ ते २० ऑक्टोबरच्या दरम्यान विधानसभा निवडणूक होईल, तर १५ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू होईल असा अंदाज पाटील यांनी लावला आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीने दणदणीत विजय मिळवला होता. विधानसभेतही याच यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी युतीने रणनिती आखायला सुरूवात केली आहे. तर दुसऱ्या बाजूला पराभवातून सावरत काँग्रेस-राष्ट्रवादीनेही एक-एक जागा निर्धाराने लढवण्याची तयारी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधताना पाटील म्हणाले की, मी जमिनीवर पाय असणारा राजकारणी आहे. त्यामुळे कोणंतही विधान गंभीरपूर्वक करतो. यंदा बारामतीची जागा जिंकण्यासाठी आम्ही जोरदार प्रयत्न करू. अजित पवार यांना पराभूत करणं हे माझं लक्ष्य आहे. मात्र वास्तवात हे काम सोपं नाही, याची जाणीव मला आहे.
हेही वाचा-
मुख्यमंत्रीपदाबाबत माध्यमांशी तुम्ही बोलू नका- मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे
शिवसेनेच्या आ. नीलम गोऱ्हे बनल्या विधान परिषदेतील पहिल्या महिला उपसभापती