परीक्षेला हजर राहूनही एका विद्यार्थिनीला गैरहजर दाखवत तिला शून्य गुण देणाऱ्या मुंबई विद्यापीठाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. या प्रकारामुळे संबंधित विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर मानवी हक्क आयोगाकडून मुंबई विद्यापीठाला नोटीस पाठवण्यात आली आहे.
काजल पाटील ही विद्यार्थिनी विधी शाखेची विद्यार्थी आहे. तिने पाचव्य सत्राची परीक्षा देऊनही या परीक्षेत तिला गैरहजर दाखवण्यात आलं होतं. परिणामी तिच्या गुणपत्रिकेवर शून्य गुण दाखवण्यात आले. याबाबत तिने विद्यापीठाकडे दाद मागूनही विद्यापीठाने तिची दखल घेतली नाही.
हे प्रकरण उजेडात आल्यावर मानवी हक्क आयोगाने या प्रकरणी सुमोटो दाखल करून घेत मुंबई विद्यापीठाला नोटीस पाठवली. या नोटीशीत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगितलं. परंतु ही सुनावणी होऊ न शकल्याने २८ जून रोजी याप्रकरणी पुन्हा सुनावणी घेण्यात येणार आहे. पहिल्या सुनावणीच्या बाबतीत विद्यापीठाकडून काजलला कुठल्याही प्रकारे कळवण्यात आलं नव्हतं. हे प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न विद्यापीठ करत असल्याचा आरोप काजलचे वकील सचिन पवार यांनी केला.
तर तांत्रिक कारणांमुळे काजलचा निकाल राखून ठेवण्यात आला होता. हा निकाल जाहीर करण्यात आला असून तिची गुणपत्रिकाही पुढे पाठवण्यात आली आहे. या प्रकरणाचा अहवाल २८ जूनला सादर करण्यास सांगितल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे उपकुलसचिव विनोद मळाळे यांनी दिली.
हेही वाचा-
दहावीचा निकाल १२ टक्क्यांनी घसरला
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: आरोपींची होणार पोलीस चौकशी