'आयआयटी मद्रास'मध्ये शिकत असलेल्या फातिमा लतीफ (१९) या विद्यार्थीनीनं आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेनंतर फातिमाच्या आत्महत्येची चौकशी व्हावी यासाठी 'आयआयटी मद्रास'मधील विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. या आंदोलनाचे पडसाद आता मुंबईतही उमटू लागले आहेत. या प्रकरणी मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. महाराष्ट्र संयुक्त कृती समितीच्या अंतर्गत हे आंदोलन करण्यात येत होत. मात्र, या आंदोलनानंतर २ विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन काही वेळानंतर त्यांना सोडलं.
अविनाश कुमार आणि बबन सोपान ठोके अशी या विद्यार्थ्यांची नावं आहेत. हे विद्यार्थी महाराष्ट्र संयुक्त कृती समितीच्या अंतर्गत कलिना परिसरात आंदोलन करत होते. त्यांच्या आंदोलनानंतर त्याठिकाणी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी आंदोलनकर्त्यांची चौकशी केली. त्यावेळी पोलिसांनी अविनाश कुमार आणि बबन ठोके या दोघांना जबरदस्तीने ताब्यात घेत वांद्रे कुर्ला संकुल(बीकेसी) पोलीस ठाण्यात घेऊन गेले.
याप्रकरणी 'पोलीसांनी कलिना परिसरात असलेल्या उपस्थितांकडे आंदोलनकर्त्यांची चौकशी केली’, असं अविनाश कुमार यानं सांगितलं. त्याशिवाय 'पोलिसांनी तू 'जेएनयू'चा विद्यार्थी असल्याचं सांगत मला ताब्यात घेतलं. त्यावेळी मी गुन्हेगार नसल्याचं म्हटलं असता, पोलिसांनी आम्हाला भीती दाखवत आमची ताकद तुला माहीत नाही असं म्हटल्याचंही कुमार यानं सांगितलं.
या विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यापूर्वी पोलिसांनी बबन ठोके याला मारलं. यामुळं त्याच्या पायाला दुखापत झाली. बबन हा मुंबई विद्यापीठात एम. ए. चं शिक्षण घेत आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर बबन या मागचं कारण पोलिसांनी विचारलं. त्यावेळी पोलिसांनी तुमचं करिअर ५ मिनिटात उद्ध्वस्त करू असं म्हटल्याचं, बबन यानं 'मुंबई लाइव्ह'ला माहिती दिली. तसंच, 'आम्ही विद्यार्थी आहोत, परंतु पोलीस आम्हाला गुंड असल्यासारखी वागणूक देत होते, असंही बबन यानं म्हटलं.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात महाराष्ट्र संयुक्त कृती समितीच्या अंतर्गत हे आंदोलन करण्यात येत होतं. या आंदोलनावेळी अविनाश आणि बबन यांच्यासोबत विद्यापीठातील आणखी विद्यार्थी होते. फातिमाच्या आत्महत्येची चौकशी व्हावी यासोबतचं जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाला विरोध म्हणून विद्यार्थी आंदोलन करत होते.
या आंदोलनासाठी विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. त्यावेळी विद्यार्थ्यांना परवानगीही देण्यात आली. मात्र, मंगळवारी संध्याकाळी कलम १४४ व १४९ लागू करत ही परवानगी रद्द केली. त्यानंतर 'विद्यार्थ्यांनी पुन्हा पोलिसांनी आंदोलनासाठी परवानगी मागितली असता पोलिसांनी आंदोलन करण्यास परवानगी दिली. त्यानुसार, बुधवारी कलिना परिसरात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. परंतु, या आंदोलनानंतर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं’, अशी माहिती मुंबई अखिल भारतीय विद्यार्थी महासंघाचे (एआयएसएफ) सचिव अमिर काझी यांनी दिली.
मागील ३ आठवड्यांपासून दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. विविध मागण्यांसाठी विद्यार्थी आंदोलन करत असून, या आंदोलनाचे पडसाद आता मुंबईतही उमटू लागले आहेत. जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाला विरोध म्हणून मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात काही विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. बुधवारी सकाळच्या सुमारास विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. परंतु या आंदोलनावेळी २ विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
जेएनयूमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील मुख्य मागणी म्हणजे वसतिगृहाच्या फीमध्ये वाढ करण्याच्या प्रस्तावाला विरोध करणं. वसतिगृहाच्या नियमावलीचा प्रस्तावित मसुदा इंटर हॉल प्रशासकीय समितीने २८ ऑक्टोबरला मंजूर केला. यातील एका कलमात म्हटले आहे की, वसतिगृहातील निवासींनी उशिरात उशिरा रात्री ११ वाजेपर्यंत अथवा ग्रंथालय बंद झाल्यानंतर अर्धा तास यापैकी जे उशिरा असेल, त्या वेळेत वसतिगृहात परतलं पाहिजे. जे विद्यार्थी निर्धारित वेळेनंतर वसतिगृहांच्या बाहेर आढळतील अथवा कोणत्याही प्रकारच्या हिंसक कृत्यांमध्ये भाग घेतील, त्यांना वसतिगृहातून बाहेर काढलं जाईल याखेरीज त्यांच्यावर विद्यापीठाकडूनही शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.
सर्व विद्यार्थी आणि अतिथी यांनी भोजनगृहात शिष्टसंमत कपडे परिधान करूनच यावं, असं मसुद्यात म्हटलं आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारल्यानंतर हा नियम रद्द करण्यात आला आहे. वसतिगृहात नव्यानं १७०० रुपये सेवा शुल्क लागू करण्यात आलं आहे. खानावळीसाठीची एकरकमी अनामत रक्कम ५५०० रुपयांवरून १२ हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. ही रक्कम परत मिळते.
एकट्याला बसता येईल, अशा खोल्यांचे भाडे दरमहा २० रुपयांवरून ६०० रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे, दोघांना बसता येईल, अशा खोल्यांचे भाडे १० रुपयांवरून ३०० रुपये करण्यात आलं आहे.
हेही वाचा -
‘युतीया’ बनवायचं बंद करा, सरकार स्थापनेवरून मनसेचा टोला
परदेशी नागरिकाचं १० लाखाचं सामान मुंबई पोलिसांनी १२ तासात दिलं शोधून