राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, आदिवासी, कला व क्रीडा, स्काऊट, गाईड आणि अपंग शाळांमधील शिक्षकांप्रमाणेच रात्रशाळांमधील उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांनाही राज्य शासनाने पुरस्कार देऊन सन्मानित करावे, अशी मागणी शिक्षक परिषदेने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे.
समाजाची निःस्वार्थ भावाने व निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाला गौरविण्यात येते. प्राथमिक विभागातून ३७, माध्यमिक ३९, आदिवासी क्षेत्रातील १८, सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका ८, कला व क्रीडा विभागातून २, अपंग १ तसेच स्काऊट व गाईड प्रत्येकी १ अशा राज्यातील १०७ शिक्षकांना सन्मानित करण्यात येते.
मात्र, या पुरस्कारासाठी रात्रशाळेतील शिक्षकांचा विचार केला जात नाही. राज्यातील रात्रशाळा शिक्षकांना या पुरस्कारापासून वंचित ठेवण्यात येते. विशेषतः मुंबईत रात्रशाळांची संख्या खूप असून दिवसा काम करून रात्रशाळांमध्ये हजारो विद्यार्थी शिकत असून त्यांना घडविण्याचे कार्य रात्रशाळा शिक्षक करीत असतात. अनेक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने अनेक शिक्षक रात्रशाळांना मदत करीत असतात. त्यामुळे रात्रशाळांमधून किमान एका शिक्षकाची निवड करून राज्यशासनाने सन्मानित करावे अशी मागणी परिषदेने केली आहे.
आम्ही याबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. याबाबत शिक्षणमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
अनिल बोरनारे, अध्यक्ष, शिक्षक परिषद
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)