भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाणारे दादासाहेब उर्फ धुंडीराज फाळके यांचा सोमवारी ३० एप्रिलला १४८ वा जन्मदिवस. ३ मे १९१३ मध्ये राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट प्रदर्शित करून त्यांनी सिनेसृष्टीचा पाया भक्कम केला. पण पहिल्या चित्रपटाची निर्मिती करताना त्यांना अनेक संघर्षांचा सामना करावा लागला.
नाताळचा काळ सुरू असताना मुंबईच्या सँडहर्स्ट रोडवरील एका चित्रपटगृहात लाईफ ऑफ ख्राईस्ट नावाचा चित्रपट सुरू होता. त्यावेळी हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची रांग लागली होती. त्यामध्ये दादासाहेब फाळके यांचाही समावेश होता. या चित्रपटातील अनेक प्रसंगादरम्यान ते विचलीत झाले. आणि त्यांनी या चित्रपटाची तुलना रामायण-महाभारताशी केली. त्यांनी हा चित्रपट चार ते पाच वेळा पहिला. त्याचीच प्रेरणा घेत मग त्यांनी आपणही चित्रपट क्षेत्रात प्रवेश करायचा असा निर्धार केला. आणि वयाच्या चाळीसाव्या वर्षी चित्रपटनिर्मितीचं कार्य सुरू केलं.
अभ्यासाची गोडी आणि फक्त तीन तासांची झोप यामुळे त्यांच्या दृष्टीवर परिणाम झाला. तरीही त्यांनी चित्रपट निर्मितीचा हट्ट सोडला नाही. त्यांनी प्रथम लंडनला जाऊन चित्रपटनिर्मितीचं तंत्र समजावून घेतलं आणि तेथून आवश्यक ती यंत्रसामुग्री आणली. आणि यासाठी त्यांना आपली विमा पॉलिसीही गहाण ठेवावी लागली. मग त्यांनी राजा हरिश्चंद्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाचं एक नवा इतिहास घडवला.
राजा हरिश्चंद्र या एका तासाच्या चित्रपट निर्मितीसाठी त्यांना जवळपास आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी लागला. या चित्रपटात राजा हरिश्चंद्राची भूमिका दादासाहेबांनीच केली होती, तर तारामतीची भूमिका साळुंके नावाच्या पुरूष कलाकाराने आणि राजा हरिश्चंद्राच्या मुलाची भूमिका दादासाहेबांचा मुलगा भालचंद्र यांनी साकारली होती. अत्यंत कठोर परिश्रम करून तयार केलेल्या या चित्रपटाने प्रदर्शनानंतर प्रचंड यश आणि पैसा मिळवला.
दादासाहेब फाळके पुरस्काराच्या पहिल्या मानकरी देविका राणी ठरल्या. त्यानंतर चित्रपटसृष्टीत प्रसिद्धी मिळवणारे पृथ्वीराज कपूर, रुबी मायर्स (सुलोचना), नितीन बोस, सोहराम मोदी, नौशाद, दुर्गा खोटे, सत्यजीत रे, व्ही. शांताराम, राज कपूर, ऋषिकेश मुखर्जी, भालजी पेंढारकर, भुपेन हजारिका, मजरुह सुलतानपूरी, गीतकार प्रदिप, डॉ. राजकुमार, दादामुनी अशोक कुमार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, दिलीप कुमार, बी. आर. चोप्रा, यश चोप्रा, देव आनंद, आशा भोसले, जयराज, ए. नागेश्वर राव, शाम बेनेगल, तपन सिंन्हा, मन्ना डे, व्ही. के. मुर्ती यांच्यासह अनेकांनी हा पुरस्कार जाहीर झाला आहे.