पुलवामा हल्ल्यानंतर माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलेलं वक्तव्य सोशल मीडियावर चांगलंच गाजलं. सिद्धू यांच्या वक्तव्याचा नेटकऱ्यांनी देखील समाचार घेतला. अनेकांनी सिद्धू यांना कपिल शर्मा शोमधून काढा, अशी मागणी केली. नेटकऱ्यांचा विरोध पाहता सिद्धू यांना कपिल शर्मा शोमधून बाहेर काढण्यात आलं. सर्व स्तरांतून विरोध होत असताना कॉमेडियन कपिल शर्मा मात्र त्यांच्या मदतीला धावून आला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कपिल शर्मानं नवज्योत सिंग सिद्धू यांची पाठराखण केली आहे. कलाकारांवर बंदी घालणं किंवा सिद्धू यांना शोमधून बाहेर काढणं हा समस्येवर उपाय असू शकत नाही. केवळ सिद्धू यांना शोमधून काढून प्रश्न सुटला असता तर ते स्वत: शोमधून बाहेर पडले असते. या प्रश्नावर काही ठोस तोडगा काढला पाहिजे. सध्या विषय भरकटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्या प्रश्नावर बोलण्याची गरज आहे त्यावर न बोलता #BoycottSidhu आणि #Boycottkapilsharmashow अशा विषयांकडे तरूणांचं लक्ष वळवलं जात आहे.
नवज्योत सिंग सिद्धू यांना काढण्यात आलं नसून ते स्वत: काही कारणास्तव शोचे काही एपिसोड शूट करू शकत नाहीत, असं कपिलकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. सध्या तरी नवज्योत सिंग सिद्धू यांच्या जागी अर्चना पूरणसिंगची वर्णी लागली आहे.
हेही वाचा