'लय असत्याल मनमौजी, पण लाखात एक तूच माझा फौजी!' असं म्हणतं अजिंक्यसमोर शीतल प्रेमाची अशी कबुली देणार आहे. टेलिव्हिजनवरची खट्याळ जोडी म्हणजे 'लागिरं झालं जी'चे अजिंक्य आणि शीतल यांचं प्रेम आता एका नव्या वळणावर पोहोचत आहे. दोघंही आपण एकमेकांना आवडत असल्याची कबुली देणार आहेत.
प्रेमात पडलेल्या या दोघांनी अजूनही एकमेकांना उघडपणे प्रेमाची कबुली दिली नाहीये. त्यामुळे आता शीतलने ठरवलं आहे की अजिंक्यला आपल्या मनातली भावना उघडपणे सांगायची. शीतल पवारने एखादी गोष्ट ठरवली की मग ती झाल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे शीतलचं प्रपोजसुद्धा तिच्यासारखंच लाखात एक होणार आहे. चक्क आर्मी ट्रेनिंग सेंटरमध्ये जाऊन शीतल अजिंक्यला प्रपोज करणार आहे.
येत्या सोमवार ते बुधवारच्या भागात आर्मी ट्रेनिंग सेंटरमध्ये आलेली शीतल आणि अजिंक्यला प्रपोज करण्याची तिची धडपड आपल्याला पाहायला मिळणार आहे. शिवाय प्रपोज नेहमी मुलानेच का करावा? मुलीच्या मनात प्रेम आहे, तर तिने ते व्यक्त करायला काय हरकत आहे? असा सल्ला देत यास्मिनने सुद्धा शीतलसोबत पैज लावली आहे, की अजिंक्यच्या आधी शीतलने त्याला प्रपोज करावं.
एनएसएस कॅम्पच्या निमित्ताने आर्मी ट्रेनिंग सेंटरमध्ये पोहोचलेली शीतल अजिंक्यला शोधून काढते आणि सगळ्या ट्रेनिंग सेंटरसमोर अनोख्या पद्धतीने अजिंक्यला प्रपोज करते. पण शीतल पाठोपाठ भैय्या म्हणजेच हर्षवर्धन आणि जयडी म्हणजेच जयश्रीसुद्धा आर्मी ट्रेनिंग सेंटरला पोहोचतात. शिवाय घरामध्ये नाना शीतलचं नाव वधूवर सूचक मंडळात नोंदवतात. अशा परिस्थितीत शीतल आणि अजिंक्यमधली ही प्रेमाची कबुली कशी होणार? याची एक निराळीच उत्सुकता आहे.