Advertisement

शाहरूखची निवड पुन्हा एकदा चुकली...


शाहरूखची निवड पुन्हा एकदा चुकली...
SHARES

मुंबई - एकीकडे सलमान खान आणि आमिर खान आपल्या यशाचा आलेख उंचावत चालले आहेत आणि दुसरीकडे शाहरुख खानच्या चित्रपटांचा दर्जा कमालीचा ढासळत चाललाय. रईस हा चित्रपट म्हणजे या ढासळलेल्या दर्जाचे प्रातिनिधीक उदाहरण म्हणावं लागेल. 1980च्या दशकात गुन्हेगारी जगतामध्ये राहून समाजाचं कल्याण करणाऱ्या नायकांचं एक मोठं पेव फुटलं होतं. दीवार, धर्मात्मा, दयावान, सत्या ही काही त्यापैकी ठळक उदाहरणं. रईस चित्रपटानं पुन्हा एकदा त्याच जुन्या मळलेल्या वाटेवरून चालण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, गेल्या दोन दशकांमध्ये हिंदी चित्रपटांच्या आशयात झालेले कमालीचे बदल आणि त्यांची हाताळणी रईसच्या मेकर्सनी लक्षात घेतलेली नाही. त्यामुळे शीर्षक रईस असलं तरी इतर आघाड्यांवरील सुमार कामगिरीमुळे हा चित्रपट भिकार ठरतो. शाहरुख खाननं खणखणीत अभिनय करीत आपलं वाढतं वय लपविण्याचा कसोशीनं प्रयत्न केला आहे. परंतु, चुकीच्या कलाकृतीत त्यानं हात घातल्यानं या मेहनतीला सहानुभूतीदेखील मिळत नाही.

गुजरातमधील एका कुख्यात गुन्हेगारावर हा चित्रपट आधारला आहे. त्याच्या बालपणापासून चित्रपटाची सुरुवात होते. या रईसच्या मोहल्ल्यात बेकायदेशीपणे दारूचा व्यवसाय सुरू असतो आणि या रईसची आई दारूच्या रिकाम्या बाटल्या भंगारात विकण्याचं काम करीत असते. आपल्या या कृतीचं ती कोई धंदा छोटा नहीं होता और धंदेसे बडा धर्म नहीं होता या डायलॉंगद्वारे समर्थन करीत असते. आपल्या आईनं सांगितलेलं हेच तत्त्वज्ञान रईस नेमकं उचलतो आणि या गैरमार्गावरून चालत मोठा होतो. ही वाटचाल करीत असतानाच मग तो आपल्या मोहल्ल्यामधील अडल्यानडल्यांची मदत करतो. त्यांच्यासाठी घरं बांधतो. त्याच्या या कृतीला विरोध असतो तो जयदीपचा (नवाजुद्दीन सिद्दीकी). परंतु, जयदीपचं ऐकण्याऐवजी तो पोलिस आणि राजकीय यंत्रणेलाच भ्रष्ट बनवत त्याची विविध ठिकाणी बदली करतो. या दोघांमधील उंदीर-मांजराचा खेळ म्हणजे हा चित्रपट आहे. दरम्यानच्या काळात त्याचा विवाहही होतो. परंतु, रईसची पत्नीही त्याला चांगल्या मार्गावर आणू शकत नाही. अखेर अशा रस्त्यावरून चालण्याचा जो शेवट अपेक्षित आहे, तोच शेवट रईसच्या वाट्याला येतो.
रईसचं कथानक लिहिलंय ते हरीत मेहता, आशीष वशी, नीरज शुक्ला आणि आणि राहुल ढोलकिया या चौघांनी. परंतु, एवढी डोकी एकत्र येऊनही रईसची पडझड व्हायला लेखक मंडळीच सर्वाधिक कारणीभूत आहेत. चित्रपटाचा काळ 1980च्या दशकामधील असल्यामुळे गुन्हेगारी वाटेवरून चालणाऱ्या नायकाचं काही जण समर्थनही करतील. परंतु कोई धंदा छोटा नहीं होता... या भ्रष्ट तत्वज्ञानाच्या पायावरून चालणाऱ्या नायकांचे दिवस आता संपले आहेत, याची जाणीव या चित्रपटांच्या मेकर्सना नसावी. त्यामुळेच रईस अडलेल्या-नडलेल्यांना मदत करीत असला तरी समाज दुबळा बनविण्याची त्याची कृती समर्थनीय ठरत नाही. चित्रपटाच्या शेवटी घटना अशा घडतात की, रईसला आरडीएक्सनं झालेल्या बॉम्बस्फोटात गोवलं जातं. त्यावेळी रईसला आपल्या न केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप होतो. मात्र आयुष्यभर बेकायदेशीरपणे केलेल्या मद्यविक्रीच्या व्यवसायाचा तसेच त्यामुळे अनेक घरं उदध्वस्त झाल्याबद्दल त्याला दुःख झाल्याचं चित्रपटात कधीच दाखविण्यात आलेलं नाही. त्यामुळेच चित्रपटात दाखविण्यात आलेल्या रईसच्या सुख-दुःखात आपण कुठंच गुंतत नाही की त्याच्याबद्दल आपल्याला थोडीही सहानुभूती वाटत नाही. रईसच्या तोंडी सतत बनियेका दिमाग और मियाभाई का डेअरिंग हा संवाद सतत ऐकायला मिळतो. परंतु, वर उल्लेखिल्याप्रमाणे गैरमार्गावरील प्रवासामुळे हा संवादही शेवटी निरर्थकच ठरतो.

शाहरुखनं रईसची व्यक्तिरेखा जीव तोडून साकारलीय हे खरं. परंतु, भूमिकेचा खोटेपणा तो ओळखू शकलेला नाही. त्यामुळेच चुकीच्या भूमिकेमधील त्याची मेहनत वाया जाण्यापलीकडं काहीच घडलेलं नाही. हीच बाब नवाजुद्दीन सिद्दीकीबाबत घडली आहे. त्याची भूमिका चांगली आहे, त्यात त्यानं जीवही ओतलाय. परंतु, चित्रपटाची भट्टीच बिघडली असल्यामुळे ही व्यक्तिरेखादेखील तकलादू ठरते. अतुल कुलकर्णी आणि उदय टिकेकर या दोघांनी आपापल्या व्यक्तिरेखा चांगल्या वठवल्यात. वादग्रस्त माहिरा खाननं फक्त छान दिसण्याचं काम चांगलं वठवलं आहे. राम संपतच्या संगीतानं साफ निराशा केलीय. एक तर या चित्रपटात संगीताला काहीही जागा नाही. तसेच यातले एकही गाणं लक्षात राहणारं नाही. त्यामुळेच कदाचित या चित्रपटाच्या मेकर्सना लैला मैं लैचाचा रीमेक करावा वाटला असावा. थोडक्यात, शाहरुखनं चुकीच्या चित्रपटात आपली मेहनत लावली असून ती त्याला महाग पडण्याची अधिक शक्यता आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा