एकिकडे महाराष्ट्रावर कोरोनाचं सावट आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रावर आणखी एक संकट कोसळणार आहे. महाराष्ट्रात २४ आणि २५ मार्चला अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केला आहे.
देशासह राज्यात कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढत असतानाच राज्याच्या काही भागांवर पुढील ४८ तासांत ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यातील जिल्हे, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, महाबळेश्वर, खान्देशमधील जळगाव जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
राजस्थानमध्ये २५ आणि २६ फेब्रुवारी रोजी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे, २६ मार्च इंदूर, उज्जैन, रतलाम, देवास, कोटा, सवाई माधोपूर, जोधपूर, उदयपूर, अहमदाबाद, बडोदा, गांधीनगर आणि नाशिक अशा अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २७ मार्चपासून दक्षिण राजस्थान आणि गुजरातमध्ये पाऊस कमी होईल, परंतु मध्य प्रदेशात भोपाळसह अनेक शहरांमध्ये पाऊस सुरूच राहील असा स्कायमेटनं अंदाज वर्तवला आहे.
जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसनं महाराष्ट्रातही धुमाकुळ घातला आहे. त्यात पावसानं हजेरी लावली तर कोरोनासाठी पुरक असं वातावरण तयार होऊ शकतं. यामुळे कोरोनाचा धोका अधिक गडद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान महाराष्ट्रात कोरानाबाधित रुग्णांचा आकडा ८९ च्या घरात गेला आहे. तर मुंबईत कोरोनामुळे ३ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी फिलीपिन्सहून आलेल्या एका ६८ वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. एकूणच दिवसेंदिवस रुग्णांच्या आकड्यात वाढहोत आहे. या पार्श्वभूमीवर वारंवार प्रशासनाकडून नागरिकांना घरी राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मात्र काही भागांमध्ये या आवाहनाला धुडकावत नागरिक घराबाहेर पडत गर्दी करत आहेत. त्यामुळे कोरोनाचं संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. अशातच आता महाराष्ट्रावर आणखी एका संकटाचं सावट आहे.
हेही वाचा