फेब्रुवारी महिन्यापासून मुंबईच्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे. या तापमानवाढीचा त्रास मनुष्यासह पक्षी, प्राण्यांनाही होत आहे. त्यामुळेच सध्या परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारांसाठी येणाऱ्या पशुपक्ष्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
उन्हामुळे पक्ष्यांनाही डिहायड्रेशनचा त्रास होत आहे. परिणामी कुठे विजेच्या तारांना अडकून तर कुठे झाडांच्या फाद्यांवरून खाली पडून पक्षी जखमी होत आहेत. रस्त्यावरील भटकी कुत्रे, मांजरी या प्राण्यांनाही प्रामुख्याने डिहायड्रेशनचा त्रास होत आहे.
याविषयी बैलघोडा रुग्णालयाचे सचिव डॉ. जे.सी. खन्ना यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गेल्या २ महिन्यांत ३५० ते ४०० प्राणी आणि पक्ष्यांवर प्राथमिक उपचार केल्याची माहिती दिली. एवढंच नाही, तर ५० ते ६० पशुपक्ष्यांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णालयात उपचार सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.
प्राण्यांच्या तुलनेत पक्ष्यांना उन्हाचा सर्वांधिक त्रास होतो. यात कबुतर, घुबड, कावळा, घार, पोपट, कोकीळा आणि सीगल पक्ष्यांचा समावेश आहे. “उपचार करण्यात आलेल्या पक्ष्यांमध्ये कबुतरांची (६० ते ६५ टक्के) संख्या अधिक आहे. तर, इतर पक्ष्यांची संख्या ३० ते ३५ टक्के आहे. या पक्ष्यांना ग्लुकोज आणि प्रतिजैविकांचा डोस दिल्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यावर सोडून दिलं जात असल्याचं डॉ. खन्ना यांनी सांगितलं.