मार्च महिन्याच्या सुरूवातीपासून प्रचंड उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना रविवारी अवकाळी पावसानं काहीसा दिलासा दिला. शनिवार, रविवार हे दोन दिवस ढगाळ वातावरण असल्यानं पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जात होती. त्यानुसार, रविवारी संध्याकाळच्या सुमारास मुंबई, पुण्यासह अंबरनाथ, बदलापूर, कल्याण तसंच जव्हार तालुक्यातील काही भागात पावसाच्या तुरळक सरी पडल्यामुळं नागरिकांना दिलासा मिळाला.
मुंबईत बोरीवली, मालाड येथे रविवारी संध्याकाळच्या सुमारास तुरळक पावसाच्या सरी पडल्या. मागील दोन मुंबईत असलेल्या ढगाळ वातावरणामुळं पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जात होती. त्यानुसार रविवारी पावसानं हजेरी लावली. यावेळी वातावरण आल्हाददायक होऊन गारवा निर्माण झाला होता. तसंच, विजाही चमकत होत्या. त्यामुळं अचानक हजेरी लावलेल्या पावसामुळं रविवारी सुटीच्या दिवशी संध्याकाळी फिरायला बाहेर पडलेल्यांची तारांबळ उडाली.
हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या २४ तासांत वातावरण ढगाळ राहणार असून सोमवारी संध्याकाळीही पावसाच्या हलक्या सरी पडणार आहेत. तसंच, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
हेही वाचा -
धारावीत इमारतीचा भाग कोसळला, एकाचा मृत्यू, ३ जण जखमी