शुक्रवारी म्हणजेच १९ नोव्हेंबरला खंडग्रास चंद्रगहण पाहण्याचा आनंद लुटता येणार आहे. भारतातील काही भागात हे ग्रहण दिसणार असून अशा प्रकारचं ग्रहण हे तब्बल ५८० वर्षांनी दिसणार आहे. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ग्रहण जवळपास साडेतीन तासांचं असेल.
वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या काही भागात हे चंद्रग्रहण पाहता येणार आहे. खंडग्रास चंद्रग्रहण हे दुपारी १२.४८ वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी ४.१७ वाजता संपेल. अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्येदेखील पूर्वेकडील भागातील लोकांना शेवटचा काही वेळ हे ग्रहण दिसू शकेल.
या चंद्रग्रहणाचा कालावधी हा ३ तास २८ मिनिट आणि २४ सेकंद एवढा असणार आहे. गेल्या ५८० वर्षातील सर्वाधिक काळ चालणारं हे चंद्रग्रहण असणार आहे. यापूर्वी एवढं दीर्घ चंद्रग्रहण हे १८ फ्रेब्रुवारी १४४० या दिवशी दिसलं होतं.
उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही भागांतही हे चंद्रग्रहण दिसण्याची शक्यता आहे. मात्र अगदी शेवटची काही मिनिटं ते पाहता येणार आहे. ११.३२ वाजता ग्रहणाचे वेध लागणार असून संध्याकाळी ५.३३ वाजता ते संपतील. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे थोडं अंतर राखून एका रेषेत येतात, तेव्हा खंड्ग्रास ग्रहण होतं.
यापूर्वीचं चंद्रग्रहण २७ जुलै २०१८ रोजी झालं होतं. तर पुढचं चंद्रग्रहण १६ मे २०२२ रोजी होणार आहे.