वनसप्ताहामध्ये केलेल्या संकल्पापेक्षा अधिक वृक्षांची लागवड केल्याचा दावा करत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राज्य सरकार आपली पाठ थोपटून घेत आहे. मात्र दुसरीकडे हे केवळ लोकसहभागाचे यश असून शासकीय विभागांनी मात्र याकडे पूर्णपणे पाठ फिरवल्याचे अल्पसंख्यांक विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. राज्यातील हरितपट्ट्यात वाढ व्हावी, या हेतूने शासनाने विविध विभागांना वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. 'महाफॉरेस्ट' या संकेतस्थळावर विविध शासकीय विभागांनी त्यांना दिल्या गेलेल्या उद्दिष्टांपैकी किती झाडे लावली? याची माहिती दिली आहे. मात्र अल्पसंख्यांक विभागाला दिल्या गेलेल्या ३७,५०० झाडांचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या जीआरला ठेंगा दाखवण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे अल्पसंख्यांक विभागाने यासंदर्भात कोणतीही कोणतीही माहिती संकेतस्थळावर दिलेली नाही.
राज्य सरकारने वृक्ष लागवड कार्यक्रमात शासकीय विभागांना उद्दिष्ट दिले आहे. त्यापैकी अल्पसंख्यांक विभागाला एकूण ३७,५०० एवढे वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. अल्पसंख्यांक विभागाच्या महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या मोकळ्या जागांवर ही वृक्ष लागवड करावयाची होती. राज्यातील अनेक मस्जिद, दर्गे, मदरसा यांच्या जागा 'वक्फ' मंडळाच्या अखत्यारीत येतात. तेथील आजूबाजूच्या आणि मोकळ्या जागांवर ही वृक्ष लागवड करायची आहे. मात्र अल्पसंख्यांक विभागाला ३७,५०० वृक्षांचे उद्दिष्ट देऊनही, त्यापैकी किती कोणत्या भागात किती खड्डे खोदले? किती खड्ड्यांमध्ये झाडे लावली? किती जणांचा सहभाग होता? यापैकी कोणतीही माहिती अल्पसंख्यांक विभागाकडे उपलब्ध नाही. प्रत्येक जिल्ह्यातील उपलब्ध जागेनुसार त्यांना वृक्षलागवड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आमच्याकडे माहिती आल्यानंतर आम्ही अद्ययावत करू, अशी उडवाउडवीची उत्तरे अल्पसंख्यांक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळत आहेत. त्यामुळे याला वनमहोत्सवाच्या बाबतीतील अल्पसंख्यांक विभागाचा हा आळशीपणा की तंत्रज्ञानाच्या बाबतीतील मागासलेपणा म्हणायचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
इतर शासकीय विभागांना दिलेल्या उद्दिष्टांपैकी गृहनिर्माण विभाग ही आपण केलेल्या वृक्षलागवडीची नोंद करण्यास विसरले की काय म्हणून त्यांचीही झालेल्या वृक्षलागवडीची माहिती अद्ययावत नाही. ७५,००० च्या वृक्षलागवडीच्या उद्दिष्टापैकी ७५२५ रोपांसाठी ५३९५ खड्डे खोडून ठेवले असल्याची माहिती केवळ संकेतस्थळावर मिळू शकते.
पर्यटन आणि सांकृतिक विभागाकडून दिलेल्या उद्दिष्टांपैकी काहीच वृक्षलागवड केली असली तरी त्यात किती जणांचा सहभाग होता याची माहितीच नाही, त्यामुळे नेमकी वृक्षलागवड झाली की या शासकीय विभागांकडून हे मनाचे श्लोक संकेतस्थळावर अद्ययावत केले जात आहेत? अशी शंकाच या निमित्ताने उपस्थित झाली आहे.
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)