मागील काही दिवसांपासून मुंबईकरांना ओढ लावणाऱ्या पावसाने अखेर शुक्रवारी सकाळी मुंबई, उपनगर, ठाणे, पालघर आणि नवी मुंबईत हजेरी लावली. या सगळ्याच ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत असून पुढचे ४ ते ५ तास अशाच जोरदार पावसाचा अंदाज स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या खासगी संस्थेने व्यक्त केला आहे.
पावसाच्या मुसळधार सरींमुळे महापालिका, रेल्वे आणि स्थानिक सरकारी प्रशासनाने केलेल्या मान्सूनपूर्व कामांचं पितळ उघडं पडलं आहे. मुंबई आणि उपनगरात जागोजागी पावसाचं पाणी साचल्याने जेव्हिएलआर, पश्चिम द्रुतगती मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग इथं वाहतूककोंडी झाली आहे. तर मुसळधार पावसाचा परिणाम मुंबईच्या उपनगरीय लोकल सेवेवरही झाला आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक १० मिनिटे उशिराने सुरू आहे. मध्य रेल्वेची जलद मार्गावरील वाहतूक २० मिनिटे उशिराने, तर हार्बर मार्गावरील वाहतूक सुमारे १० ते १५ मिनिटे उशिराने सुरू आहे.
Maharashtra: Traffic crawls on Western Express Highway as Mumbai receives heavy rainfall. pic.twitter.com/gk5JmvBCo7
— ANI (@ANI) June 28, 2019
मुंबई महापालिकेने पाणी तुंबण्याच्या समस्येवर उपाय योजना सुरू केली असून मुंबईकरांनी घाबरू नये, असं आवाहन केलं आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार, पुढील ४८ तासांत महाराष्ट्रात हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मुंबईसोबतच कोकण, गोवा, पुणे, कोल्हापूर आणि नाशिकमध्येही पुढच्या २ दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरात २८ ते ३० जून दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा-
पाणी जपून वापरा; तलावांमध्ये २० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा