केरळ, तामिळनाडू आणि गुजरातमध्ये ओखी वादळानं चांगलंच थैमान घातलं. मुंबईवर ओखी वादळाचा परिणाम दिसून आला. सोमवारी संध्याकाळपासून मुंबईत पावसाला सुरुवात झाली. मंगळवारी देखील पावसाचा जोर काही ओसरला नाही. २४ तासात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली. पण महाराष्ट्रात थैमान घालणाऱ्या या वादळाला ओखी हे नाव कसं पडलं? कुणी ओखी हे नाव ठेवलं? असे अनेक प्रश्न अनेकांना पडले असावेत.
'ओखी' हा बंगाली शब्द असून बंगाली भाषेत त्याचा अर्थ होतो डोळा. बांगलादेशनं या चक्रीवादळाला 'ओखी' असं नाव दिलं आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं त्याचं रुपांतर 'ओखी' चक्रीवादळात झालं. हिंद महासागरात म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील वादळांना 'उष्णकटिबंधीय वादळ' म्हटलं जातं. थायलंडकडून या चक्रीवादळाला 'मोरा' हे नाव देण्यात आलं होतं.
बदलत्या जागेनुसार वादळांना नावं दिली जातात. भारतीय उपखंडातील वादळांसाठी भारत, बांग्लादेश, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, म्यानमार आणि थायलंड या आठ देशांनी वादळांची नावं दिली आहेत. प्रत्येक देशानं वादळासाठी प्रत्येकी ८ अशी ६४ नावं ठरवलेली आहेत. अग्नी, आकाश, बिजली, जल, लहर, मेघ, सागर आणि वायू अशी नावं भारतानं दिली आहेत. याच प्रकारे पृथ्वीवरच्या इतर वादळांची नावं ठरवली जातात.
२००० सालापासून वादळांना नावं देण्यास सुरुवात झाली. वादळादरम्यान हवामान विभाग आणि नागरिकांमध्ये संवाद साधणं सोपं जावं, यासाठी वादळांना नावं दिली जातात.
हिंद महासागरात निर्माण झालेल्या वादळांना भारतीय हवामान खात्याकडून नावं दिली जातात. यापुढे हिंद महासागरात निर्माण होणाऱ्या वादळाला 'सागर' हे नाव देण्यात येणार आहे.
हेही वाचा