महिषासूराच्या नाशासाठी अवतार घेणाऱ्या दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे नवरात्र. १० ऑक्टोबर म्हणजेच बुधवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. नवरात्रीत ९ दिवस व्रत ठेवून देवीची मनोभावे पूजा केली जाते. महाराष्ट्रात माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि वणीची सप्तश्रृंगी देवी अशी देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत. येथे नवरात्रीत ९ दिवस मोठी यात्रा भरते. देवीच्या दर्शनासाठी अनेक भक्त लांबून येतात.
पण प्रत्येकाला तिकडे जाऊन देवींचे दर्शन घेणं शक्य होत नाही. मुंबईकरांना तर कामातून वेळ काढून या देवींच्या दर्शनासाठी जाणं फारच अवघड असतं. पण मुंबईत देखील सांस्कृतीक आणि धार्मिक महत्त्व टिकवून ठेवणारी देवीची अनेक मंदिरे आहेत, जिथं जाऊन तुम्हाला देवींचं दर्शन घेता येऊ शकतं. अशाच ९ मंदिरांची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.
मुंबईची ग्रामदैवत,अशी मुंबादेवीची ओळख. मुंबादेवीच्या नावावरूनच मुंबईचं नामकरण झाल्याचं सर्वांनाच ठाऊक आहे. मुंबादेवी मुंबईतील आद्य रहिवासी कोळी समाजाची आराध्य दैवत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करून मुंबादेवीचं मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात येतं. नवरात्रीत पाठ वाचनाबरोबर नवमीला हवन केले जाते.
मुंबईतल्या काळबादेवी परिसरातील मुख्य बाजारपेठेत असलेली ३०० वर्षांपूर्वीची महाकालिमाता काळबादेवी म्हणून ओळखली जाते. काळबादेवी मंदिरात नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा केला जातो. काळबादेवीला मांसाहारी नैवैद्य चालत नाही. परंपरेनुसार धार्मिक विधीवत पूजा केली जाते. नवमीला देवीसमोर हवन केले जाते. मार्गशीर्षात कृष्ण पक्षातील अमावस्येला काळबादेवीची मोठी जत्रा भरते. काळबादेवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी असते.
मुंबईतल्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक म्हणजे महालक्ष्मी मंदिर. या मंदिराची देखील चांगली ख्याती आहे. १७८५ साली मंदिरात देवीची स्थापना करण्यात आली. या मंदिरात महालक्ष्मी, कालिका, महासरस्वती या तीन देवींच्या मूर्ती आहेत. मंदिरात नवरात्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सकाळी ७ वाजता आणि सायंकाळी ७.३० वाजता मुख्य आरती, सकाळी ६.३० वाजता धूप आरती आणि रात्री १० वाजता शेजारती असा मंदिरातील कार्यक्रम असतो. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केल्यानंतर मंदिर पूर्ण दिवस सुरू असते. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते.
या मंदिरात नवरात्रोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. महाकाली देवी असली तरी देवीला शुद्ध शाकाहरी नैवेद्य दाखवला जातो. नवरात्रोत्सवात मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते.
मंदिराच्या आवारात महाकाली, हरिहर, पुरातन विठ्ठल-रखुमाई मंदिर, साईबाबा तसेच खोकला बरा करणाऱ्या खोकला देवीचे मंदिर आहे. तसंच सारस्वत समाजाची कुलदेवता शांतादुर्गा देवीचे मंदिर आहे. मंदिरात रोज सकाळी ८.३० आणि रात्री ७.३० वाजता ट्रस्टतर्फे आरती केली जाते. नवरात्रीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
नवरात्रीमध्ये देवीला चांदीची छत्री घातली जाते. नवरात्रीत भजन, हवन केले जाते तसेच रोज महिलांचे भजन होते.
प्रभादेवी मंदिरापासून थोड्याच अंतरावर जाखादेवीचं मंदिर आहे. नवरात्रीत होमभवन केले जाते आणि संध्याकाळी आरती असते. नवसाला पावणारी देवी अशी जाखादेवीची ख्याती असल्याने स्त्रिया नवरात्रीत देवीला साड्या अर्पण करतात. नवरात्रोत्सवात मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते.
गोलफादेवी हे उंच टेकडीवर वसलेले कोळी बांधवांचे मंदिर आहे. अजूनही मंदिरात देवीला कौल लावण्याची प्रथा आहे. नवरात्रीत पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले असते. नवरात्रीत मंदिराच्या परिसरात गरबा खेळला जातो.
विरार इथल्या टाटोळे तलावाच्या परिसरात असलेली देवी जागृत स्थान म्हणून ओळखली जाते. नवरात्रीत पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. त्यानंतर हरबा देवीची आरती आणि अष्टमीला होमहवन, गरबा असे कार्यक्रम केले जातात. लहान मुलांना होणाऱ्या कांजण्या, देवी असे रोग देवी बरे करते असा इथे येणाऱ्या भाविकांचा विश्वास आहे. त्यामुळे इतर दिवशीही मंदिरात भाविकांची गर्दी असते.
हेही वाचा