Advertisement

गणेशोत्सव २०१९ : स्वराज्याची मुहर्तमेढ रोवणारा गणेश गल्लीचा राजा

१९४२ साली उत्सवाच्या माध्यमातून स्वराज्य स्थापनेच्या चळवळीचे देखावे 'श्रीं'च्या पुढे ठेवण्यात येऊ लागले. त्यावेळी स्वातंत्र्य चळवळीची भाषणे, करमणुकीद्वारे मेळे, नाटके, पोवाडे, इत्यादी लोक शिक्षणाचे कार्यक्रम उत्सवाद्वारे लोकांपुढे ठेवण्यात येऊ लागले.

गणेशोत्सव २०१९ : स्वराज्याची मुहर्तमेढ रोवणारा गणेश गल्लीचा राजा
SHARES

लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, (गणेशगल्ली) लालबाग मधील मानाच्या मंडळांपैकी एक आहे. १९२८ मध्ये मंडळाची स्थापना झाली असून मंडळाचं हे ९२ वं वर्ष आहे. सन १९७७ साली सुवर्ण महोत्सवी वर्षात देशातील सर्वात पहिली २२ फूट उंच मूर्ती बनवली आणि लालबागचं नाव जगभरात पोहचवलं. नवसाचा गणपती म्हणूनही त्याला ओळखलं जातं.


स्वराज्य निर्मितीचा इतिहास

१९२८ साली लालबाग सर्वजनिक उत्सव मंडळाची स्थापना पेरुची चाळ इथं करण्यात आली. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेनं सुरू झालेल्या स्वराज्याच्या चळवळीत उत्सव माध्यमातून लोक जागृती आणि एकजुट व्हावी, हे यामागचे उद्धिष्ट होते. प्रथम हा उत्सव फक्त पाच दिवस होत असे. भजनं, किर्तनं, भारुड इत्यादी कार्यक्रम होत असत. या उत्सवामुळे  व्यापारी वर्गानं गिरणगावातील मराठी माणसांना एकत्र आणण्याचं फार मोठं कार्य केलं. पुढे मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येप्रमाणे बाजार मोठा झाला आणि हा उत्सव तेजुकाया मेन्शन इथं स्थलांतरित करण्यात आला


उत्सवाचं स्वरुप आणि त्याला मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेऊन त्याचबरोबर वाढती लोकवस्ती विचारात घेऊन अंबाजी मास्तर आणि काही तडफदार कार्यकर्त्यांनी १९३७-३८ साली हा उत्सव गणेशगल्ली परिसरात म्हणजेच आता देवस्थान असलेल्या जागी आणला. त्याच काळात हा श्री गणेश उत्सव अकरा दिवस साजरा करण्यास सुरवात होऊन शारदामातेचा नवरात्रौत्सव साजरा करण्यास सुरवात झाली. या उत्सवात वाडिया, चिंचपोकळी, काळाचौकी, करिरोड, जेरबाई रोड, मेघवाडीपासून संपूर्ण जुने लालबाग सहभागी होतात.


सुभाषचंद्र बोस यांचे 
'श्री' रूप

१९४२ साली उत्सवाच्या माध्यमातून स्वराज्य स्थापनेच्या चळवळीचे देखावे 'श्रीं' च्या पुढे ठेवण्यात येऊ लागले. त्यावेळी स्वातंत्र्य चळवळीची भाषणं, करमणुकीद्वारे मेळे, नाटके, पोवाडे, इत्यादी लोक शिक्षणाचे कार्यक्रम उत्सवाद्वारे आयोजित करण्यात येऊ लागले. १९४५ साली सुभाषचंद्र बोस 'श्री' रुपानं स्वराज्याचा सुर्य सात घोडयांचा देखावा सादर करण्यात आला. त्यावर्षी लोकांचा प्रतिसाद पाहून ४५ दिवसांनी 'श्रीं'चे विसर्जन करण्यात आले. याचा मोठा बोलबाला संपूर्ण मुंबईमध्ये झाला होता. हा देखावा कै.राजापुरकर मुर्तीकार यांनी साकारला होता.  



पहिली सर्वात मोठी मूर्ती

१९७७ साली सुवर्ण महोत्सवी वर्षात संपुर्ण हिंदुस्थानातील पहिली २२ फुटी गणरायाची उंच मूर्ती बनवली. त्यानंतर अमृतमहोत्सवी वर्षात भव्य आणि नेत्रदीपक अशा सजावटीवर भर देऊन दक्षिण भारतामधील मदुराई इथल्या प्रसिद्ध मीनाक्षी मंदिराची प्रतिकृती भविकांसमोर साकारली. अमृतमहोत्सवी वर्षानंतर २२ फुटी उंच गणराया सोबत आकर्षक सजावट हे मंडळाचे समीकरण बनून गेले.


भव्य-दिव्य देखावे

भारतातील विविध तिर्थक्षेत्र, पर्यटन स्थळे काहींना वेळेअभावी आणि आर्थिक अडचणीमूळे पाहता येत नाहीत. तेव्हा विविधतेनं नटलेल्या भारतातील या स्थळांचा आनंद भक्तांना घेता यावा या विचारानं उत्सव मंडळानं भव्य-दिव्य देखावे उभारण्यास सुरवात केली. मदुराईचे मिनाक्षी मंदिर, राजस्थानचे हवामहल, गुजरातचे अक्षरधाम, सुवर्णलंका, हिमालय-केदारनाथ मंदिर आणि म्हैसुरचे चामुंडेश्वरी मंदिर आदी देखावे सादर केले. यावर्षी अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. आजतागायत भाविकांनी हे सर्व देखावे अक्षरश: डोक्यावर घेतले. याशिवाय विविध नामांकित संस्थांनी पारितोषिके देऊन मंडळास वेळोवेळी गौरविले.



हेही वाचा

गणेशोत्सव २०१९ : इथून ऑर्डर करा पर्यावरणपूरक गणपती

गणेशोत्सव २०१९: पूरग्रस्तांना गणेश मंडळांचा मदतीचा हात





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा