बुद्धीचा देवता असलेले श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं. महाराष्ट्रासह मुंबईदेखील आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जाते. घरोघरीच नाही तर सार्वजनिक मंडळांमध्ये देखील बाप्पाचा जयघोष घुमतो.
गणपती बाप्पा मोरया! हा मंत्र अनेकांच्या मनात आनंद भरतो. गणपती पुजेच्या परंपरांचा मन:पूर्वक आनंद लुटावयाचा असल्यास तुम्हाला या शहरातील सांस्कृतीक पूजा मंडळांना भेट द्यावी लागेल. आम्ही तुम्हाला अशाच काही गणेश मंडळांची माहिती देणार आहोत.
सर्वात पहिली सार्वजनिक गणपती पूजा ही केशवजी नाईक चाळीत सुरू झाली. १८९३ सालापासून इथं मोठ्या भक्ती भावानं बाप्पाची पूजा केली जाते. पर्यावरणपूरक अशा लहान गणेश मूर्तीसाठी हे मंडळ ओळखले जाते. लाऊडस्पीकर, ढोल-ताशाविना इथं गणेशोत्सव पार पडतो.
मागील चार पिढ्यांपासून एकाच कुटुंबाकडून इथल्या बाप्पाची मूर्ती साकारली जात आहे. या चाळीतील आयोजन समिती नियमीतपणे भजन कार्यक्रम, मुलांसाठी स्पर्धांचं आयोजन करत असते. सकाळी १० ते रात्री ११ या दरम्यान तुम्ही कधीही इथल्या बाप्पाचं दर्शन घेऊ शकता.
स्वातंत्र्यपूर्व काळात तरूण पिढीला संघटित करून स्वातंत्र लढ्यात समाविष्ट करून घेण्याच्या उद्देशानं सन १८९३ सालापासून लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची परंपरा महाराष्ट्रात सुरू केली. त्यानुसार तरूणांनी तु. भि. कदम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली १९४३ साली गिरगावचा राजा स्थापन केला. सार्वजनिक गणपती दक्षिण विभागातर्फे दरवर्षी गणेशोत्सवात इथं अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.
गणेश गल्लीचा गणपती मुंबईचा राजा म्हणून ओळखला जातो. पेरू चाळच्या सभोवती राहणाऱ्या युवांनी १९२८ साली लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ सुरू केला होता. लोकमान्य टिळकांनी या सामाईक मंचाद्वारे सामान्य जनतेस एकत्र आणण्याच्या आणि त्यांच्यात स्वातंत्र्य लढ्याची ज्योत पेटवण्याच्या विचारांनी हा उत्सव सुरू केला होता.
लोकमान्य टिळकांना अपेक्षित असणारा सार्वजनिक गणेशोत्सव बेलापूरच्या आग्रोळी गावात पहायला मिळतो. या गावात एकच गणेशोत्सव साजरा केला जातो. एक गाव एक गणपती या संकल्पनेतून साजरा होणाऱ्या या उत्सवाचं यंदाचं ५८ वं वर्ष आहे.
या गावत १२० कुटुंब आहेत. प्रत्येक कुटुंबाकडून १२०० रुपये वार्षिक देणगी घेतली जाते. गणेशोत्सवादरम्यान ११ दिवस भजन किर्तनाचे कार्यक्रम होतात.
नवसाला पावणारा विश्वाचा राजा अशी ओळख असणारा वडाळ्याचा जीएसबी गणपती श्रीमंत गणपतींपैकी एक ओळखला जातो. यावर्षी जीएसबी गणेशोत्सव मंडळ ६४ व्या वर्षात पदार्पण करत आहे. १९५५ साली जीएसबी समाजातील माधव पुराणिक यांनी या गणेशोत्सवास सुरुवात केली. त्याकाळी लहान स्वरूपात सुरू झालेली ही गणेशपूजा आज भव्यदिव्य झाली आहे.
जीएसबी मंडळ हे सार्वजनिक गणेशमंडळ असले तरीही या गणेश मूर्तीची स्थापना केवळ ५ दिवसांसाठी किंग सर्कल इथल्या जीएसबी स्पोर्ट्स क्लब ग्राऊंडवर केली जाते. या गणपतीसाठी खास दिखाव्याची किंवा थीमची रोषणाई केली जात नाही. हे मंडळ केवळ धार्मिक परंपरेनुसार नियमित पूजा करते.