राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. मात्र, या कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. काही दिवसांपूर्वी लोकांपर्यंत कोरोनाची माहिती पोहोचवणाऱ्या पत्रकारांनाच कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे यामधील मुंबईतील ३१ पत्रकारांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
माध्यम प्रतिनिधींसाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या व्यापक तपासणी मोहिमेनंतर त्यांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यात मुंबईतील पत्रकार व कॅमेरामन्स मिळून ५३ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. प्रथम उपचारानंतर त्यांची दुसऱ्यांदा चाचणी करण्यात आली, त्यावेळी चाचणी अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळं त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.
यासंदर्भात मुंबई महापालिकेनं ही माहिती दिली असून, या सर्व रुग्णांना १४ दिवस होम क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मुंबईत कोरोनाचे अनेक हॉटस्पॉट तयार होत आहेत. येथील प्रत्येक घटना-घडामोडींची माहिती मुंबईकरांपर्यंत पोहचवण्यासाठी धडपडत असणाऱ्या विविध माध्यमांमधील पत्रकार आणि कॅमेरामन्सनाही कोरोना साथीनं गाठलं.