रेल्वे स्थानकांवर आपातकालीन परिस्थितीत उपचार करता यावेत, यासाठी वन रुपी क्लिनिक ही संकल्पना सुरू करण्यात आली. आकडेवारीनुसार, ८ महिन्यात या वन रुपी क्लिनिकने आतापर्यंत ४൦ हजार रुग्णांवर उपचार केले आहेत.
रेल्वे अपघात, नियमित तपासणी, प्रसूती, हार्ट अटॅकचे रूग्ण, ब्लड प्रेशरचे रुग्ण अशा अनेक प्रकारच्या रुग्णांवर वन रुपी क्लिनिकने आतापर्यंत उपचार केले आहेत. शिवाय, या ८ महिन्यांत रुग्णांचे २ कोटी १ लाख रुपये वन रुपी क्लिनिकने वाचवल्याचा दावाही करण्यात आला आहे.
या क्लिनिकच्या माध्यमातून ८ महिन्यांत रेल्वे अपघातातील ८०० रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. तर १० हजार रुग्णांनी या क्लिनिकमधून रक्ताची तपासणी केली आहे. त्याशिवाय २൦ हजार रुग्णांनी एक रुपयांत वैद्यकीय सल्ला घेतला आहे. २ प्रसूतीही या क्लिनिकच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत.
या क्लिनिकमध्ये ९ हजार रक्तदाबाच्या रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. तर, हृदयविकाराचा झटका आलेल्या पाच रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. त्याशिवाय तणावग्रस्त असलेल्या ५०० रुग्णांनी मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचार घेतले आहेत. तर, या क्लिनिकच्या फार्मसीमध्ये १४ हजार ५६० रुग्णांनी औषधांसाठी भेट दिल्याची माहितीही वन रुपी क्लिनिकतर्फे देण्यात आली आहे.
कमी पैशात उपचार व्हावा, हाच या क्लिनिकचा हेतू आहे. त्यामुळे मे ते डिसेंबर या प्रवासात वन रुपी क्लिनिकने २ कोटी रुपये वाचवले आहेत. तसंच, या क्लिनिकचा अधिक लोकांना लाभ व्हावा, म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत.
डॉ. राहुल घुले, संचालक, वन रुपी क्लिनिक
सद्यस्थितीत वन रुपी क्लिनिक रेल्वेच्या १൦ स्थानकांवर उपलब्ध आहेत. लवकरच गोवंडी आणि टिटवाळा या स्थानकांत देखील ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. शिवाय, भविष्यात आणखी स्टेशन्सवर हा प्रकल्प सुरू करण्याचा मानस आहे.
हेही वाचा