आयुर्वेदाच्या साथीने भयावह वाटणाऱ्या कॅन्सरसारख्या दुर्धर रोगावरही मात करता येऊ शकते हे ‘भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट’ संचालित ‘इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अॅन्ड रिसर्च सेंटर’(आयसीटीआरसी)ने सिद्ध केलं आहे.
‘भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट’ने पुणे येथील वाघोली येथे नुकताच ‘कॅन्सर सर्व्हायव्हर्स डे’ साजरा केला. वैद्य केशवमहाराज सरदेशमुख यांच्या प्रेरणेने डॅा. सदानंद सरदेशमुख आणि डॅा. अरविंद कुलकर्णी यांनी सुरू केलेल्या ‘इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रिटमेंट अँड रिसर्च सेंटर’च्या माध्यमातून देशभरातून अनेक कॅन्सरग्रस्त रुग्णांनी उपचार घेत कर्करोगावर मात केली आहे. ‘कॅन्सर सर्व्हायव्हर्स डे’च्या निमित्ताने कॅन्सरशी लढा देणाऱ्या रुग्णांनी आपला अनुभव कथन करत इतर रुग्णांना प्रेरीत केलं.
या कार्यक्रमाला ‘टाटा हॅास्पिटल’ संलग्नित ‘अॅडव्हान्स सेंटर फॅार ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅसर’च्या संचालिका डॅा. शुभदा चिपळूणकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. याशिवाय ‘भारतीय संस्कृती ट्रस्ट’चे अध्यक्ष आणि आयसीटीआरसीचे रिसर्च डायरेक्टर डॅा. सदानंद सरदेशमुख, आयसीटीआरसीचे आॅन्कोलॅाजी डायरेक्टर डॅा. अरविंद कुलकर्णी, खासदार अनिल शिरोळे, ‘हाफकिन इन्स्टिट्यूट’च्या संचालिका डॅा. निशिगंधा नाईक, मोलेक्युलर बायोलॅाजी व सेल बायोलॅाजी तज्ज्ञ डॅा. रजनी भिसे, आयसीटीआरसीच्या संशोधन सल्लागार डॅा. सुधा गांगल, ‘नॅशनल केमिकल लॅबोरटरी’च्या ज्येष्ठ संशोधिका डॅा. विद्या गुप्ता, ‘नॅशनल युवा को-आॅपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’चे अध्यक्ष राजेश पांडे, डॅा. सुश्रुत सरदेशमुख, डॅा. सुकुमार सरदेशमुख आदी वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
आपल्याकडे कॅन्सरचा इन्सिडन्स वाढत नाही, पण होणारे प्रकार बदलत आहेत. कॅन्सरबाबत जागृती वाढत असल्याने लवकर उपचार सुरू केले जात आहेत. पण जीवनशैली बदलल्याने प्रकार बदलले आहेत. अनियमित आहार, औद्योगिकीकरणाचा प्रभाव, फास्टफूड, स्ट्रेस, जीवनशैली, प्रदूषण, डाएट यामुळे कॅन्सर होतो. कॅन्सर हा मल्टिफॅक्टोरीअल डिझीस आहे. भविष्यात कॅन्सर सर्व्हायव्हल डे साजरा करण्याची वेळच येऊ नये, असं मत डॅा. चिपळूणकर यांनी व्यक्त केलं.
आयुर्वेद या पुरातन शास्त्राला साइंटिफीक फ्रेममध्ये बसवणं हा या प्रोजेक्टमागील उद्देश आहे. यासाठी बऱ्याच संस्थांमधून शास्त्रज्ञ एकत्र आले आहेत. आयुर्वेदाला शास्त्राची मान्यता मिळवून देण्यासाठी आमची धडपड सुरू आहे. आयुर्वेदाचे गुणधर्म पुराव्यानिशी सिद्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जगाला आयुर्वेदाचा पुरावा द्यायचा आहे. हा पुरावा साइंटिफीकरीत्याच देता येईल.
आयुर्वेद आणि अॅलोपॅथीची भाषा वेगळी आहे. आयुर्वेद हे एक होलीस्टिक मेडिसीन आहे, जे केवळ शरीराची व्याधी नीट करत नाही, तर माणसाला सुदृढ बनवतं. व्याधी होऊ नये याकरता शरीराला तयार करतं. ‘होलिस्टिक मेडिसीन फॅार बॅाडी, सोल अँड माईंड’ असं आयुर्वेदाबाबत म्हणता येईल, तर रोग का होतो याच्या अणूरेणूंचा शोध अॅलोपॅथी घेतं.
आयुर्वेद आणि अॅलोपॅथी यांनी एकत्र येणं गरजेचं आहे, पण दोघांनीही एकमेकांचा आदर राखला पाहिजे. वाद घालता कामा नये. हे जर मान्य केलं तरच एक चांगला रिसर्च होऊ शकतो असं डॅा. चिपळूणकर म्हणाल्या. यामुळे जागतिक पातळीवर आयुर्वेदाला एक बॅकबोन मिळू शकतो. हेच करण्याचं काम सुरू आहे. पोद्दार, नायर आणि टाटा हॅास्पिटल यांच्या एकत्रित प्रयत्नांनी हे कार्य सुरू आहे.
आयसीटीआरसीच्या माध्यमातून मागील २४ वर्षांत आयुर्वेदिक चिकित्सेचा लाभ घेतल्याने गुणवत्तापूर्ण जीवन जगणाऱ्या १४३ कॅन्सर सर्व्हायव्हर्सच्या मनोगतांचं एकत्र संकलित पुस्तक यावेळी प्रकाशित करण्यात आलं. ‘स्टोरीज आॅफ कॅन्सर सर्व्हायव्हर्स’ नावाच्या या पुस्तकाचं प्रकाशन डॅा. चिपळूणकरांच्या हस्ते करण्यात आलं. आयसीटीआरसीच्या असिस्टंट डायरेक्टर डॅा. वासंती गोडसे यांनी पुस्तक निर्मिती मागील भूमिका विशद केली.
उपचार आणि औषधोपचारांमध्ये रुग्णांना दिलासा मिळावा याकरता आयसीटीआरसीच्या वतीने हेल्थ कार्ड प्रकाशित करण्यात आलं आहे. या हेल्थ कार्डचं अनावरण डॅा. रजनी भिसे यांनी केलं. या कार्डच्या माध्यमातून रुग्णांना वैद्यकीय तपासण्या व पंचकर्म चिकित्सेमध्ये २५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. आयसीटीआरसीच्या डेप्युटी डायरेक्टर डॅा. विनिता देशमुख यांचा या कामात मोलाचा वाटा असून, डॅा. वासंती गोडसे यांच्या साथीने त्यांनी कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारीही सांभाळली.