काही दिवस तुमचा जगाशी संपर्क तुटला तर? मित्र परिवार तर दुरची गोष्ट, तुम्ही तुमच्याच कुटुंबियांना देखील भेटू शकत नाही. एकाच बंद खोलीत तुम्हाला १४ दिवस काढावे लागले तर? कठिणच आहे हे. पण कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेकांनी स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे.
कोरोना व्हायरसच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर जगभरात आतापर्यंत हजारो रुग्णांना क्वारंटाईन आणि आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चाललीय. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ४२ वर गेला आहे. मुंबईत (Mumbai) एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर देशात कोरोनाचा हा तिसरा बळी आहे.
खबरदारी म्हणून कोरोना व्हायरसच्या संसर्गाची लक्षणं दिसताच संबंधिताला क्वारंटाईन होण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. तर काही रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. पण रुग्णांना आपल्यासोबत नेमकं काय केलं जाणार? किंवा किती दिवस एका खोलीस ठेवलं जाणार? हे माहित नसल्यानं ते पळून जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
क्वारंटाईन आणि आयसोलेशन या शब्दांनीच अनेकांना घाम फुटण्यास सुरुवात होते. आज आम्ही तुम्हाला क्वारंटाईन आणि आयसोलेशन याचा अर्थ सांगणार आहोत. जेणे करून गैरसमज कमी होण्यास मदत होईल.
एखाद्या रुग्णामध्ये अमुक एका आजाराची लक्षणं सिद्ध होऊन आजार असल्याची बाब समोर येते तेव्हा त्या रुग्णाला रुग्णालयात दाखल केलं जातं. तिथं त्याला वेगळं ठेवण्यात येतं. यालाच आयसोलेशन (isolation) म्हणतात.
क्वारंटाईन (quarantine) होणं म्हणजे इतरांपासून स्वत:ला लांब ठेवून वेगळं राहणं. संबंधित रुग्णापासून इतर कुणालाही संसर्ग होऊ नये म्हणून स्वत:ला एका खोलीत बंद करणं म्हणजेच क्वारंटाईन होणं.
उदाहरणार्थ चीन, इटली, अमेरिका आणि कोरोनाची साथ पसरलेल्या देशातून अनेक भारतीययेत आहेत. अशा एखाद्या ठिकाणहून एखादी निरोगी व्यक्ती आली. पण, त्याच्यामध्ये आजार आहे की नाही? किंवा तपासणी केली तरी सुरुवातीला नेगिटिव्ह येणं. पण हळूहळू नंतर कोरोनाची लक्षणं आढळून येणं. त्यामुळे अशा व्यक्तीला वेगळं ठेवलं जातं, त्यालाच क्वारंटाईन असं म्हणतात.
क्वारंटाईन हा मूळ लॅटीन शब्द आहे. ज्याचा अर्थ चाळीस आहे. पूर्वी बाहेरच्या देशाहून आलेल्या जहाजांना चाळीस दिवस बंदरापासून लांब ठेवलं जात होतं. जहाजावरील सर्व कर्मचा-यांची आरोग्य तपासणी होत असे. जहाज रोगमुक्त आहे, असं जाहीर केल्यावर त्या जहाजाला बंदरावर येण्याची परवानगी दिली जात होती. पुढे प्लेग, कावीळ, ताप, त्वचेचे रोग, अशा संसर्गजन्य आजारासाठी रुग्णांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था सुरू झाली.
कोरोना व्हायरसच्या रुग्णांपासून इतर कुणालाही त्याची लागण होऊ नये यासाठी क्वारंटाईन केलं जातं. संसर्गजन्य आजारात रुग्णाच्या सोबत राहणाऱ्या व्यक्तींना आजार होण्याची शक्यता सर्वाधिक असते. तर रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या सगळ्यांनाच कोरोना व्हायरसपासून धोका आहे. कुटुंबियांपासून सहा फूट लांब राहण आवश्यक असतं.
आजारी व्यक्तींचं आयसोलेशन केलं जातं. तर, क्वारंटाईन हे निरोगी व्यक्तीचं केलं जातं. संबंधित व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा धोका उदभवू नये यासाठीच हे दोन्ही मार्ग अवलंबले जातात. त्यासाठी घाबरण्याचं कोणतंच कारण नाही. त्यामुळे कोरोनाग्रस्त संशयित रुग्णांनी पळून जाऊ नये किंवा कोरोनाच्या भिती घाबरू नये.
हेही वाचा