Advertisement

लठ्ठपणा हा आजार - सोशल मीडियामुळे वजन कमी करण्याकडे भर


लठ्ठपणा हा आजार - सोशल मीडियामुळे वजन कमी करण्याकडे भर
SHARES

विकसनशील देशात प्रामुख्याने आढळणारी समस्या म्हणजे वाढलेलं वजन. आशिया खंडात सध्या चीन आणि भारतात ३० टक्क्यांहून अधिक नागरिक लठ्ठपणाचा सामना करत आहेत. तर, सध्या भारतात २० दशलक्ष नागरिक लठ्ठ असून ही वाढ अशीच होत राहिल्यास २०३० साली ही संख्या ५० दशलक्षपर्यंत जाण्याची शक्यता आहे.



लठ्ठपणा हा एक आजार -

लठ्ठपणा हा एक आजार असून यामुळे हाय ब्लडप्रेशर, कंबरदुखी, हृदयाचे आजार, कर्करोग आणि गुडघेदुखी यांसारखे आजार होण्याचा धोका वाढतो. पुरुषांमध्ये लठ्ठपणा हा साधारण पस्तिशीनंतर आणि महिलांमध्ये मासिकपाळी बंद झाल्यावर येतो, असा सर्वसाधारण समज आहे. पण, गेली दोन दशकात बदललेल्या जीवनशैलीमुळे बालवयातच किंवा किशोरवयातच लठ्ठपणाची समस्या वाढली आहे.

हल्ली सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे लठ्ठपणाविषयी थोड्या प्रमाणात का होईना पण जागरुकता आली आहे. याच जागरुकतेमुळे शहरातील नागरिकांचं वजन कमी करण्याकडे कल दिसून येत आहे.

भारतीय इंटरनेट आणि मोबाईल असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, २०१७ साली मोबाईलवर इंटरनेटचा वापर करण्यात शहरामध्ये ५१ टक्के तर ग्रामीण भागात १६ टक्क्याने वाढ झाली आहे. मोबाईलवर इंटरनेटचा वापर वाढल्यामुळेच आरोग्यविषयक जागरूकता वाढीस लागल्याचे निरीक्षण मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ट हॉस्पिटलने नोंदवलं आहे.

गेल्या २ वर्षात शहरातील नागरिकांमध्ये वाढलेल्या वजनाविषयी चांगल्या प्रकारे जागरूकता आली आहे. मोबाईलवर आरोग्यविषयक असलेल्या अॅप्समुळे अनेक नागरिकांना स्वतः च्या किंवा कुटुंबीयांच्या वजनाविषयी काळजी वाटते. त्यामुळे अनेकदा इंटरनेटवर बघून वजन कमी करण्याचा सल्ला दिला जातो.

- डॉ. रमण गोयल, बेरिएट्रिक आणि मेटाबोलिक सर्जन, वोक्हार्ट हॉस्पिटल

लठ्ठपणा हा एक आजार आहे हे कळायला फार काळ लागला. पण, आता इंटरनेटचा वापर वाढल्यामुळे जे रुग्ण आमच्याकडे वजनाच्या तक्रारी घेऊन येतात, त्या रुग्णांना वाढत्या वजनाचे तोटे फार विस्ताराने समजावे लागत नाही. वजन कमी करण्यासाठी असंख्य अॅप्स उपलब्ध असल्याकारणाने त्यांचा वापरही केला जातो. पण, हे सर्व करताना डॉक्टरांचा सल्ला घेणं तितकंच महत्त्वाचं असल्याचंही डॉ. गोयल सांगतात.

हृदयविकार झालेल्या रुग्णांमध्ये एक प्रकारची भीती निर्माण झालेली असते. पण, हृदयविकाराविषयी माहिती सहज उपलब्ध झाल्यामुळे आता हेच रुग्ण आपल्या आरोग्याविषयी सतर्क झाले आहेत. पण, वाचलेली सर्वच माहिती ही सरसकट प्रत्येक पेशंटला लागू होत नाही.
- डॉ. पवन कुमार, जेष्ठ हृदयशल्यविशारद, लीलावती हॉस्पिटल

भारतामध्ये मोबाईलवर इंटरनेट वापरण्याचा हा सुवर्णकाळ सुरू आहे आणि उपलब्ध असलेली सर्वच माहिती ही वैद्यकीय विज्ञानांच्या भिंगातून तपासली गेली जात नाही. पण ही माहिती वाचल्यामुळे नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागृती येत आहे ही नक्कीच दिलासा देणारी बाब असल्याचंही डॉ. पवन म्हणाले. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा