सध्या मुंबईसह राज्याचं वातावरण चांगलंच तापलंय. दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे मुंबईकरांच्या अक्षरश: घामाच्या धारा निघत आहेत. वाढत्या उन्हामुळे त्वचेच्या विकारातही वाढ झाली आहे. गेल्या एक महिन्यात त्वचासंबंधीच्या रुग्णांची संख्या २५ ते ३൦ टक्क्यांनी वाढली असल्याचं निदर्शनास आले आहे.
महापालिका आणि सरकारी रुग्णालयांमध्ये दिवसाच्या ओपीडीत जवळपास हजारांपेक्षा जास्त रुग्ण हे त्वचेच्या विकारासंबंधी येत असल्याचं सांगण्यात आलं आहे. केईएम, नायर, सायन आणि जे. जे. रुग्णालयात त्वचेच्या विकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.
जे. जे. रुग्णालयातील त्वचारोग विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, ओपीडीत दिवसभर जवळपास ४൦൦ रुग्ण येतात. यातील ७൦ टक्के रुग्ण फंगल इन्फेक्शनचे असतात. त्याशिवाय, दाद, खाज आणि उन्हात होणाऱ्या अॅलर्जीमुळे रुग्ण हैराण आहेत.
याविषयी जे. जे. रुग्णालयाचे त्वचारोग विशेषज्ञ डॉ. रत्नाकर कामत यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'फंगल इन्फेक्शन तयार करणारे फंगस आपल्या शरीरात आधीच असतात. खूप वेळ घाम जर शरीरात मुरला तरी खाज उठू शकते. त्यातून फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीराच्या स्वच्छतेसाठी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. गरमीमुळे त्वचा संबंधित आजारांत वाढ होत आहे. त्यामुळे शरीरासोबत खाण्या-पिण्याच्या सवयींकडेही लक्ष देणं गरजेचं असतं'.
उन्हाळ्यात वाढत्या गरमीमुळे त्वचेचं इन्फेक्शन होण्याचं प्रमाण वाढतं. गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी हे प्रमाण वाढलं आहे. उन्हात सतत फिरल्यामुळे घामोळं, नायटा, गजकर्ण, खरुज अशा समस्या होतात. शिवाय, सूर्याच्या किरणांची एलर्जी ही होते. दिवसाला जवळपास ३५൦ ची ओपीडी असते. ज्यात २५൦ पेशंट तरी फंगल इन्फेक्शन किंवा सूर्याच्या किरणांची एलर्जीचे असलेले येतात.
- डॉ. रत्नाकर कामत, त्वचा रोग विशेषज्ञ, जे. जे. रुग्णालय