जेवण रुचकर, चविष्ट व्हावं म्हणून आपण मीठ जरा जास्तच वापरतो. शिवाय, गोड पदार्थ बनवताना आपण साखर ही वापरतो. पण, या दोन्ही गोष्टींच्या अतिवापर आणि अतिसेवनामुळे किडनीचे विकार होण्याची शक्यता बळावते. याच पार्श्वभूमीवर आणि महिला दिनाच्या निमित्ताने डॉक्टरांची संघटना आयएमएने प्रोजेक्ट किडनी सुरू केला आहे. ६ मार्चपासून या अभियानाची सुरूवात झाली आहे.
भारतात किडनी विकारांनी त्रासलेल्या रुग्णांची वाढती संख्या आहे. शिवाय, किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत देशात जवळपास २ लाखांपेक्षा जास्त लोकं आहेत. त्यामुळे अशा असंसर्गजन्य आजारांबाबत लोकांमध्ये जनजागृती वाढावी, या दृष्टीने हे अभियान सुरू करण्यात आलं आहे.
० देशभरातील आयएमएचा प्रत्येक सदस्य (डॉक्टर) त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांना याबाबत माहिती देणार
० सोशल मीडिया, जाहिरात, डॉक्युमेन्ट्रीच्या माध्यमातून जनजागृतीचा प्रयत्न
० किडनी विकार होण्याची शक्यता असलेल्या रुग्णांची तपासणी
० मधुमेह, हायपरटेन्शन, किडनी स्टोनचे रुग्ण, लठ्ठपणाने ग्रस्त रुग्ण यांची तपासणी
० अशा रुग्णांची क्रिएटिनीन आणि लघवीची तपासणी
० किडनी विकारतज्ज्ञांच्या मार्फत लोकांना माहिती
० डॉक्टरांनी किडनी विकार कसा ओळखावा? यासाठी 'प्रायमरी किडनी केअर फॉर फॅमिली फिजिशिअन्स' हे पुस्तक छापणार
० लोकांनी आपल्या जेवणातून साखर आणि मीठाचं प्रमाण कमी करावं, यासाठी एक खास योजना सुरू करणार
० किडनी विकार नियंत्रणात आणण्यासाठी आयएमए प्रयत्न करणार
० फरसाण दुकानात मिळणाऱ्या खाद्य पदार्थांवरही त्यात मीठाचं प्रमाण किती असावं याबाबत माहिती असावी
० ज्या खाद्यपदार्थांमध्ये मीठ कमी आहे, अशा पदार्थांवर टॅक्स कमी करण्यात यावा
० जास्त मीठ असलेल्या खाद्य पदार्थांवर जास्त टॅक्स असावा
० लहान मुलांसाठी अशा खाद्य पदार्थांची जाहिरात नको