मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढतो आहे. हा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याची चिन्ह दिसत आहे. शिवाय, वाढत्या कोरोनामुळं राज्य सरकारनं कडक निर्बंध लावण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, महाराष्ट्रात गेल्या आठवड्याभरात दररोज ३० हजारापेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. त्यामुळं २ व ३ एप्रिलपासून राज्यात लॉकडाऊन लागु होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचं आवाहन वारंवार राज्य सरकारकडून नागरिकांना केलं जातं. मात्र तरीही लोक सूचनांचं पालन करत नसून, सामाजिक अंतराच्या नियमाचे उल्लंघन करत आहेत. यामुळं नागरिकांना वाढत्या कोरोनाचं गंबिर्य समजावं यासाठी लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय उपलब्ध राहणार नाही.
दरम्यान, सर्वत्र लॉकडाऊनच्या चर्चेचा उधाण आलं असलं तरी अद्याप लॉकडाऊनचा कोणताही निर्णय झालेला नाही, मात्र गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकार सध्या लावण्यात आलेले निर्बंध अधिक कडक करण्याच्या दिशेने पावलं उचलणारच आहे. त्या दृष्टीने लोकांनी मानसिकता ठेवली पाहिजे, असा स्पष्ट इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी बुधवारी दिला.
काही दिवसांपूर्वी झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे तसंच मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्स डॉक्टर्स व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्यातील कोरोनाच्या स्थितीवर सोमवारी चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील तसंच शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अभ्यागतांना पूर्ण प्रवेशबंदी घालावी. खासगी कार्यालये व आस्थापना ५०टक्के कर्मचारी संख्येचे निर्बंध पाळत नसतील, तर लॉकडाऊनची तयारी करावी, अशा स्पष्ट सूचना बैठकीत दिल्या.
एकीकडे आपण कोविड (covid19) परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील याचा आटोकाट प्रयत्न करतोय. मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. अजूनही खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांचं पालन होत नाही. विवाह समारंभ नियम तोडून सुरु आहेत. बाजारपेठांमध्ये देखील सुरक्षित अंतर, मास्क याचं पालन होताना दिसत नाही.
शेवटी लोकांच्या आरोग्याचं संरक्षण करणं याला आमचं प्राधान्य आहे. त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचं पालन करावं अन्यथा लॉकडाऊन करावं लागेल असं समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देश उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी मुख्य सचिवांना दिले.
हेही वाचा -