Advertisement

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय; सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी

मुंबईसह राज्यभरात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय; सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी
SHARES

मुंबईसह राज्यभरात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. या कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम आणि आंदोलनांवर सोमवारपासून काही दिवस बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. रविवारी रात्री जनतेशी संवाद साधताना केली. रुग्णवाढीची आकडेवारी आणि नागरिक शिस्तपालन करतात की नाही, हे तपासून लॉकडाऊन लागू करण्याबाबत ८-१० दिवसांनी निर्णय घेतला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत असून राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही. नियम न पाळणारी मंगल कार्यालये, सभागृहे, उपाहारगृहे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. मास्क वापरा, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा ही त्रिसूत्री पाळा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

रुग्णसंख्या अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये सोमवारपासून कठोर निर्बंध किंवा अशंत: लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. सर्व शासकीय समारंभ गर्दी टाळून आणि शक्यतो दूरचित्रसंवाद माध्यमातून करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. मागील काही दिवसांमध्ये राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या दोन-अडीच हजारांवरून अनेक पटींनी वाढून रविवारी सात हजारांवर पोहोचली.

गेल्या काही दिवसांमध्ये अनेक नागरिकांनी कोरोनाची साथ गेली, असं समजून मास्कचा वापर बंद केला होता. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. विवाह आणि अन्य समारंभ आयोजित केलं गेलं. मंदिरे आणि अन्य धार्मिक कार्यक्रम घेतले गेले. राजकीय मेळावे, सभा, आंदोलने यामध्ये कोरोनाविषयक नियमांचं पालन झालं नाही. त्यामुळं अनेक पटींनी रुग्णवाढ होत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अमरावतीसारख्या ठिकाणी सर्वाधिक रुग्णवाढीचा याआधीचा टप्पा ओलांडला गेला आहे. ही दुसरी लाट आहे का हे काही दिवसांमध्ये समजेल. पण पाश्चाात्य देशांप्रमाणे राज्यातही निर्बंध पाळण्याबाबत शिथिलता आल्यानं हे घडलं आहे. ब्रिटन, ब्राझील या देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आली आहे. राज्यात हे टाळायचं असेल, तर पुढील काळात मास्कचा वापर आणि इतर नियमांचं काटेकोर पालन करावं लागेल, असं ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

घरातूनच कामावर भर द्या

उपनगरी रेल्वे गाड्या, बेस्ट बस आणि अन्य सार्वजनिक वाहतूक साधनं, कार्यालयं, हॉटेल्स यामधील गर्दी कमी करण्यासाठी कार्यालयीन वेळा बदलाव्यात आणि शक्यतो घरून काम करण्याची मुभा कर्मचाऱ्यांना द्यावी. कार्यालयात कमीतकमी कर्मचारी संख्या ठेवावी. त्यासाठी सर्वांना एकाच वेळी न बोलावता त्यांचे गट करून आलटून-पालटून बोलवावं, असं आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी खासगी आस्थापना, उद्योगांना केलं.

देशात १४,२६४ नवे रुग्ण

देशभरात पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली असून, गेल्या २४ तासांत १४,२६४ नवे बाधित आढळले. दिवसभरात ९० रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची एकूण संख्या १,५६,३०२ वर पोहोचली आहे. देशभरात सध्या १,४५,६३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण १.३२ टक्के आहे.

'मी जबाबदार' मोहीम

कोरोना नियंत्रणासाठी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम राबविण्यात आली होती. आता 'मी जबाबदार' ही नवी मोहीम सोमवारपासून राज्यात राबविण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा