मुंबईत सध्या अनेक प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळेच रस्त्यांची अवस्था खराब असू शकते. मात्र आपण ज्या महानगरातून (कोलकाता) आलो आहोत तेथील रस्त्यांपेक्षा मुंबईतील रस्त्यांची स्थिती खूपच चांगली आहे, असे मत उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी सोमवारी नोंदवले.
रस्ते बांधणीच्या सदोष निविदाप्रक्रियेविरोधात भाजपचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केलेली जनहित याचिका फेटाळताना मुख्य न्यायमूर्तीनी हे मत नोंदवले. अॅड्. अभिजीत देसाई यांच्यामार्फत शिंदे यांनी केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली.
काही वर्षांपूर्वी रस्ते बांधणीत घोटाळा झाला होता. तो उघडकीस आल्यानंतर काही कंत्रादारांना काळ्या यादीतही टाकण्यात आले. त्यानंतरही रस्ते बांधणी, दुरुस्तीच्या निविदाप्रक्रियेत काळ्या यादीतील कंत्राटदार सहभागी होत असल्याचा मुद्दा शिंदे यांनी याचिकेत उपस्थित केला होता.