गोवंडी - तब्ब्ल 686 रहिवाशांवर रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. पंचशील गोवंडी एसआरए सहकारी गृहनिर्माण या सहकारी संस्थेचा झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प दहा वर्षांपासून रखडला आहे. यातच विकासकाने भाड्याचे पैसे ही देणे बंद केले आहे. या विरोधात शुक्रवारी गोवंडीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथे सर्व रहिवाशांनी विकासकाचे काम बंद पाडत ठिय्या आंदोलन केले.
गेल्या दहा वर्षांपासून हे काम रखडलेल्या अवस्थेत आहे. 2006 सालापासून हा प्रकल्प विकासक लकडावाला डेव्हलपर्सच्या हातात आहे. एकूण 686 रहिवाशांनी या प्रकल्पात सहभाग घेतला आहे. यातील काहिंना विकासकाने ट्रांजिस्ट कॅम्प बांधून दिला आहे. तर काहिंना विकासक मासिक भाडे देत होता. परंतु आता विकासकाने इमारत देखील पूर्ण बांधली नाही आणि भाडेही देण्यास टाळाटाळ सुरू केल्याने रहिवासी हवाल दिल झाले आहे. या बाबत त्यांनी झोपडपट्टी पुनर्विकास अधिकारी, स्थानिक पोलीस ठाणे तसेच संबंधित संस्था यांच्याकडे पत्रव्यवहार करून ही परिस्थिती जैसे थेच राहिल्याने संतप्त नागरिकांनी प्रकल्पाचे बांधकामच बंद पाडले.