नवी मुंबई मार्गे कल्याण डोंबिवलीला जाणाऱ्या वाहनचालकांचा ट्रॅफिकमध्ये अडकून प्रचंड वेळ वाया जातो. त्यामुळे ऐरोलीपासून मुंब्रापर्यंत बोगदा तयार करुन १२ किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा नवीन रस्ता बांधण्याचं काम प्रगतिपथावर आहे. यातील बोगदा १.८ किलोमीटर इतका आहे.
लॉकडाउनमध्ये अतिशय मंद गतीने सुरू असलेल्या कामाचा आढावा शुक्रवारी खासदार डॉ. शशिकांत शिंदे यांनी घेतला. यातील बोगद्यासह पहिल्या टप्प्याचं काम सप्टेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होणार असल्याचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं.
ऐरोली ते मुंब्रा वाय जंक्शन आणि मुंब्रा वाय जंक्शन ते कटाई अशा दोन टप्प्यात हे काम पूर्ण होणार आहे. त्यासाठी १.८ किलोमीटरचा बोगदा बनवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील रस्ता हा ऐरोलीच्या खाडी पुलाजवळ सुरू होईल तो थेट मुंब्र्यातील वाय जंक्शनपर्यंत असेल. दुसऱ्या टप्प्यात याच रस्त्याला जोडून एलिव्हेटेड मार्ग तयार करण्यात येईल जो थेट कटाई नाका येथे उतरेल.
या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान होणार असून याचा सर्वाधिक फायदा कल्याण-डोंबिवली- अंबरनाथ-बदलापूर येथील रहिवाशांना होणार आहे. कारण, या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर काटई ते ऐरोली हा प्रवास फक्त १० मिनिटांत पूर्ण होणार आहे.
कल्याण-डोंबिवली आणि पुढे अंबरनाथ, बदलापूरपर्यंत मोठी गृहसंकुले निर्माण होत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात ठाणे नवी मुंबई आणि मुख्यतः मुंबईला जोडण्यासाठी हा रस्ता अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे.
सर्वसामान्यांसाठी ५०० ते ६०० रुपयात उपलब्ध होणार कोरोनाची लस
टोलच्या दरात सरासरी १० टक्के वाढ