दिवाळीमध्ये मुंबईमध्ये सुमारे 4 हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय म्हाडा प्राधिकरणाने घेतला आहे. या निर्णयामुळे अनेकांचं स्वत:च्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. मुंबई मंडळाने सोडतीची तयारी सुरू केली असून लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
2019 नंतर मुंबईत सोडत निघालेली नाही. मुंबई मंडळाकडे सोडतीसाठी पुरेशी घरे नसल्यानं आणि काम सुरू असलेली घरे सोडतीनंतर वर्षभरात ताबा देता येण्याच्या स्थितीत नसल्यानं सोडत रखडली आहे. यामुळे आताच्या या दिवाळीतील सोडतीच्या बातमीमुळे सोडत मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं घराचं स्वप्न पाहणाऱ्यांना दिलासा मिळाल्यास दिसतंय.
मुंबईतील अंदाजे चार हजार घरांसाठी सोडत काढण्याची तयारी सुरू केल्याचं म्हाडाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं. दिवाळीच्या दीड-दोन महिन्यांआधी जाहिरात प्रसिद्ध करून प्रत्यक्ष सोडत काढण्यात येईल, असंही ते म्हणालेत.
म्हाडाच्या (Maharashtra Housing and Area Development Authority) या सोडतीत पहाडी, गोरेगाव येथील 3 हजार 15 घरांपैकी अल्प आणि अत्यल्प गटातील दोन हजार 683 घरांचा समावेश असण्याची शक्यता आहे. तसेच कोळे-कल्याण, अॅन्टॉप हिल, विक्रोळी आदी ठिकाणच्या घरांचाही समावेश असणार आहे.
काही दिवसांपूर्वी तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही म्हाडाच्या घरांच्या लॉटरीसंदर्भात घोषणा केली होती. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं होतं. दिवाळीत 3000 घरांची सोडत निघेल, असं सांगितलं होतं. एका वृत्तपत्राशी बोलताना म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी दिवाळीत मुंबईतील अंदाजे चार हजार घरांसाठी सोडत काढण्याची तयारी सुरू केल्याची माहिती दिली.
हेही वाचा