Advertisement

आरे वृक्षतोडीविरोधात हरकतीचा पाऊस, पण वृक्ष प्राधिकरण म्हणते ३ हजारच हरकती

मेट्रो प्रकल्पाअंतर्गत झाडे कापण्याविरोधात ३ हजारापर्यंत सूचना-हरकती आल्या असून यात काही हजारांची भर पडेल, असं वृक्ष प्राधिकरणाने स्पष्ट केलं आहे. पर्यावरणप्रेमींच्या किती सूचना-हरकती आल्या हे १० ऑक्टोबरला जनसुनावणी वेळेसच कळेल आणि तेव्हाच दूध का दूध, पाणी का पाणी होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

आरे वृक्षतोडीविरोधात हरकतीचा पाऊस, पण वृक्ष प्राधिकरण म्हणते ३ हजारच हरकती
SHARES

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ प्रकल्पातील कारशेडसाठी २७०२ झाडं कापण्याला सेव्ह आरे, सेव्ह ट्री, वनशक्ती, आरेतील आदिवासी आणि पर्यावरणप्रेमींनी जोरदार विरोध केला आहे. त्यामुळेच या झाडांच्या कत्तलीविरोधात मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे सूचना-हरकतीचा अक्षरशः पाऊस पडत आहे. पर्यावरणप्रेमींच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत ३० हजाराहून अधिक सूचना हरकती सादर झाल्या आहेत. पण वृक्ष प्राधिकरणाचे उद्यान अधिक्षक आणि वृक्ष अधिकारी जितेंद्र परदेशी यांनी मात्र 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना ही बाब स्पष्टपणे नाकारली आहे.

आतापर्यंत ३ हजारापर्यंत सूचना-हरकती आल्या असून यात काही हजारांची भर पडेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. पर्यावरणप्रेमींच्या किती सूचना-हरकती आल्या हे १० ऑक्टोबरला जनसुनावणी वेळेसच कळेल आणि तेव्हाच दूध का दूध, पाणी का पाणी होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.




१० आॅक्टोबरपर्यंत मुदत

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एम एम आर सी ) ने २७०२ झाडं कापण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाकडे परवानगी मागितली आहे. त्यानुसार वृक्ष प्राधिकरणा ने जाहीर निवेदन प्रसिद्ध करत यासंदर्भात सूचना हरकती मागवल्या आहेत. १० ऑक्टोबरपर्यंत नागरिकांना सूचना-हरकती लिखित स्वरूपात वृक्ष प्राधिकरणाकडे सादर करायच्या आहेत. आरे कारशेडला आणि आरे जंगल नष्ट करायला पर्यावरणप्रेमींचा सुरुवातीपासूनच विरोध आहे. त्यामुळेच सध्या सूचना-हरकतींचा पाऊस पडत आहे. तर सेव्ह आरे, सेव्ह ट्री आणि वनशक्तीने अधिकाधिक सूचना हरकती सादर करण्याचं आवाहन करत एक मोहीमच सुरू केली आहे.

'सेव्ह ट्री'चे सदस्य झोरू बाथेना यांच्या म्हणण्यानुसार केवळ एका संस्थेकडूनच सूचना-हरकतीचे २६ हजार मेल करण्यात आले आहेत. तर इतरही शेकडो नागरिक हरकती नोंदवत आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने हरकती सादर होतील.


एका संस्थेची एकच हरकत

मुंबईतील MUSE या संस्थेने बुधवारी १६०० हरकती नोंदवल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष निशांत बंगेरा यानी दिली आहे. परदेशी मात्र ३ हजाराच्या आकड्यावर ठाम आहेत. एकाच संस्था वा व्यक्तीकडून शेकडो हरकती आल्या म्हणजे त्या वेगळ्या होत नाहीत. त्या एकच समजल्या जातील, असं म्हणत ३ हजार हरकती आल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आता १० ऑक्टोबरलाच नेमकं काय खरं हे स्पष्ट होईल.



हेही वाचा-

एमएमआरसीला पुन्हा दणका! आरेतील परवानगी नसलेल्या झाडांना हात लावू नका-उच्च न्यायालय

आरेतील झाडांच्या कत्तलीचा वाद पेटला, तीन याचिका दाखल



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा