मुंबई - मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावरील टोलच्या दरात 35 रुपयांनी वाढ होणार आहे. ही टोलवाढ 1 एप्रिल 2017 पासून लागू होणार असल्याने 1 एप्रिलपासून मुंबई-पुणे प्रवास महागणार आहे. टोलच्या करारानुसार दर तीन वर्षांनी टोलच्या दरात 18 टक्क्यांनी वाढ होते. त्यानुसार ही टोल दरवाढ होणार आहे. 35 रुपयांनी टोल दरवाढ झाल्याने आता हलक्या वाहनांसाठी 195 रुपयांऐवजी 230 रुपये मोजावे लागणार आहेत.
मिनी बसची टोल दरवाढ 55 रुपयांनी, ट्रकचे टोल 75 रुपयांनी तर बसचे टोल दर 103 रुपयांनी वाढले आहेत. 2019 पर्यंत द्रुतगती मार्गावर टोलवसुली केली जाणार आहे. मात्र मुळात कंत्राटदाराने नोव्हेंबर 2016 मध्येच टोलवसुलीची संपूर्ण रक्कम वुसल केली आहे. त्यामुळे नियमानुसार आता द्रुतगती मार्गावरील टोलवसुली बंद व्हायला हवी. पण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि कंत्राटदारांकडून टोलधाड सुरूच असल्याचे सांगत टोल अभ्यासकांनी याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.
द्रुतगती मार्गावरील टोल वसुली बंद केली जात नसल्याने टोल अभ्यासकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाश शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) आणि एमएसआरडीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही गुन्हा दाखल करण्यासंबंधी तक्रार दाखल केली आहे.
एवढे करुनही टोल बंद करण्याऐवजी टोल दरवाढ केल्याने टोल अभ्यासक विवेक वेलणकर यांनी जनतेची शुद्ध फसवणूक असल्याचे मुंबई लाइव्हशी बोलताना सांगितले आहे. तर युती सरकार टोलमुक्तीचे आश्वासन देऊन सत्तेवर आले आणि त्याच आश्वासनाला सरकार हरताळ फासत आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांची सरकारला जाब विचारण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
असे आहेत नवे टोल दर
वाहनाचा प्रकार | जुने दर (रुपयांत) | नवे दर (रुपयांत) |
कार | 195 | 230 |
मिनी बस-एलसीव्ही | 300 | 355 |
ट्रक | 418 | 493 |
बस | 572 | 675 |
जड वाहने | 990 | 1168 |
अवजड वाहने | 1317 | 1555 |