मुंबई महानगरपालिकेने शहरातील १२७ वर्षे जुने पूल पाडून त्याठिकाणी केबल पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळं सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होते आहे. त्यामुळं ही वाहतूककोंडी कमी करण्यासाठी लवकरच मुंबई महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. या प्रकल्पातंर्गत मुंबईत केबल आधारित १२ पूल उभारण्यात येणार आहेत.
हे काम २०२५ पर्यंत पूर्ण केले जाणार असून त्यासाठी १७७५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पुलांचे बांधकाम महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि रेल्वे करणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. या पुलांचे काम २०२२ पासून टप्याटप्याने सुरु करण्यात येणार असून २०२५ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे माहिती समोर येत आहे.
या नव्या पुलांमुळं वाहतूक कोंडीची समस्या सुटण्याबरोबरच मुंबईच्या सौदर्यांतही भर पडणार आहे. या पुलांचे बांधकाम सुरु असताना वाहतूक सुरळीत राहील, याची काळजी घेतली जाईल. केबल स्टेड पद्धतीमुळे पुलाचे बांधकाम मजबूत असेल. पायासाठी कमी जागा लागणार असल्यानं पूलांखाली अधिक मोकळी जागा उपलब्ध होईल.
नवे केबल पूल
प्रचंड धावपळीच्या जीवनासाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईचा वाहतुकीच्यादृष्टीने जगातील सर्वाधिक तणावग्रस्त शहरांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. पॅरिस, जकार्ता आणि दिल्ली या शहरांसह सर्वाधिक तणावग्रस्त शहर म्हणून मुंबईचा सर्वात वरचा क्रमांक लागतो. रोड सेफ्टी चॅरिटी ब्रेक.ओआरजी या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून नुकत्याच झालेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे.
या सर्वेक्षणानुसार बहुतांश चालकांनी स्टेअरिंग व्हीलवर असताना आपण तणावात असल्याचे किंवा आपल्याला राग आल्याची कबुली दिली. वाहतुकीच्यादृष्टीने जगातील प्रमुख शहरांचे मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये मुंबईला ७.४ गुण मिळाले.
मुंबईत जगातील सर्वात व्यस्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. अनेक पायाभूत सुविधा असूनही याठिकाणी वाहन चालवणे हे सर्वात तणावपूर्ण असल्याचे निदर्शनास आले आहे.