
घोडबंदर रस्ता (Ghodbunder Road) जानेवारी 2026 पर्यंत पूर्णपणे वाहतूक कोंडीमुक्त (Traffic Jam Free) होईल, अशी महत्त्वाची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी केली आहे.
गायमुख घाट पुनर्पुष्टीकरण, घोडबंदर सेवा रस्ता जोडणी (Service Road Connectivity), अमृत जलवाहिनी (Amrut Jalvahini) टाकणे आणि महावितरणच्या (MSEDCL) वाहिन्यांचे स्थलांतरण ही सर्व कामे वेळेत पूर्ण केली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.
'जस्टिस फॉर घोडबंदर रोड'च्या प्रतिनिधींनी बैठकीत घोडबंदर रोडवरील विविध समस्यांबाबत सादरीकरण केले. याचा आढावा घेतल्यानंतर मंत्री सरनाईक यांनी एमएमआरडीए, महापालिका, मेट्रो आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यांवरील कामांच्या सद्यस्थितीची माहिती घेतली.
गायमुख घाटातील ठाणे महापालिका हद्दीतील रस्त्यांच्या पुर्नपुष्टीकरणाचे काम वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून पूर्ण केले जाईल. 'जस्टिस फॉर घोडबंदर रोड'च्या प्रतिनिधींनी सुचवल्याप्रमाणे, घोडबंदर रस्त्यावरील सर्व उड्डाणपुलावरील रस्त्यांची डागडुजी आणि पुनर्पुष्टीकरण एकाचवेळी हाती घेऊन पूर्ण केले जावे असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत.
तसेच, गायमुख घाटाच्या पुनर्पुष्टीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर घोडबंदर रस्ता ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी, असे निर्देशही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठाणे महानगरपालिकेस दिले.
मंत्री सरनाईक यांनी यावेळी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या आणि आता अंतिम टप्प्यात असलेल्या विविध विकास कामांचीही माहिती दिली. या कामांचे लोकार्पण नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस तसेच डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा
