Advertisement

'उधाण वारा' घेऊन मराठीकडे वळले सतीश कौशिक

मराठी सिनेमांनी आज बॅालिवुडमध्येही आपला दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळंच बॅालिवुडकरांची पावलं मराठीकडे वळत आहेत. आता या यादीत सतिश कौशिक यांचंही नाव सामील झालं आहे.

'उधाण वारा' घेऊन मराठीकडे वळले सतीश कौशिक
SHARES

मराठी सिनेमांनी आज बॅालिवुडमध्येही आपला दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळंच बॅालिवुडकरांची पावलं मराठीकडे वळत आहेत. आता या यादीत सतिश कौशिक यांचंही नाव सामील झालं आहे.


निर्माते म्हणून पदार्पण 

अमिताभ बच्चन, सुभाष घई, अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा, संजय दत्त, अजय देवगण आदी हिंदीतील दिग्गजांच्या पावलावर पाऊल ठेवत ज्येष्ठ अभिनेता व दिग्दर्शक सतीश कौशिक मराठी चित्रपटसृष्टीत दाखल होत आहेत. आजवर कौशिक यांनी नेहमीच आपल्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि चतुरस्त्र दिग्दर्शनातून आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे. रंगमंच, छोटा पडदा आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजविल्यानंतर कौशिक आता मराठी चित्रपटसृष्टीत निर्माते म्हणून पदार्पण करत आहेत. 


मन उधाण वारा

'मन उधाण वारा' या आगामी मराठी चित्रपटाच्या निर्मितीसाठी कौशिक यांनी पुढाकार घेतला आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे. द सतीश कौशिक एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स आणि लोका एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमानं, तसंच पेन मुव्हीजचे जयंतीलाल गडा यांच्या प्रस्तुतीखाली 'मन उधाण वारा'हा चित्रपट ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं हिंदीतील दिग्गज मंडळी एकत्र आल्याचं पहायला मिळणार आहे.


सुंदर प्रेमकथा

कोकणच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर अतिशय तरल आणि सुंदर प्रेमकथा या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहे. या चित्रपट निर्मितीबद्दल बोलताना कौशिक म्हणाले की, संहिता व आशय या दोन गोष्टी मराठी चित्रपटांच्या बलस्थान राहिल्या आहेत. एक वेगळा दृष्टीकोन देणाऱ्या या मराठी चित्रपटाची निर्मिती आपण करावी असं मला वाटलं. त्यातूनच 'मन उधाण वारा' ही हळवी प्रेमकथा मराठी रसिकांसाठी आणली आहे. ही प्रेमकथा असली तरी आयुष्याचे वेगवेगळे पदर यातून अनुभवायला मिळणार आहेत. 


कथा प्रदीप कुरबा यांची

किशोर कदम, उत्तरा बावकर, सागर कारंडे, शर्वरी लोहकरे, मोनल गज्जर, रित्विज वैद्य, डॉ. शरद भुताडिया, विनोद कुलकर्णी, भारती पाटील, वैभव राजाध्यक्ष, साक्षी गांधी, ज्युलिया मोने, अनुराधा अटलेकर या कलाकारांच्या यात भूमिका आहेत. चित्रपटाची कथा प्रदीप कुरबा यांची असून, पटकथा-संवाद सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी लिहिले आहेत. निशांत कौशिक, अक्षय गडा, धवल गडा चित्रपटाचे निर्माते आहेत. छायांकन मिलिंद जोग, तर संकलन कृष्णत घार्गे यांचं आहे.



हेही वाचा  -

ख्रिसमस पूर्वी अवतरणार चुलबुल पांडे

सुभाष घईंच्या 'विजेता'चा प्रवास सुरू




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा